– हिमांशू
कपातून प्या, बशीतून प्या, ग्लासातून प्या नाहीतर कुल्हडमधून प्या… चहा तो चहाच! साखरेचा प्या, बिनसाखरेचा प्या, गोळी टाकून प्या, कोरा प्या, दूध घालून प्या नाहीतर नुसत्या दुधाचा प्या… चहा तो चहाच! भल्या पहाटे प्या, सकाळी उठल्याबरोबर प्या, पहिला-दुसरा-तिसरा प्या, दुपारी प्या, घरी प्या, ऑफिसात प्या, हॉटेलात प्या नाहीतर टपरीवर प्या… चहा तो चहाच! साधा प्या, स्पेशल प्या, मारामारी प्या, बासुंदी प्या, मसाला प्या, तंदूर प्या, रामभरोसे प्या नाहीतर अमृततुल्य प्या… चहा तो चहाच! चहाला वेळ नसते; पण वेळेला चहाच लागतो, असं म्हणतात.
चहाच्या दुकानात हा “सुविचार’ लिहिलेलाही आढळतो. चहा पिण्याची होणारी इच्छा तीव्र असते, मग तिला तल्लफ म्हणा नाहीतर व्यसन म्हणा! वेळेवर चहा मिळाला नाही तर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडते. डोकं दुखू लागतं. काहींना तर चक्करही आल्यासारखी वाटते. दीर्घ प्रवासात चहाची व्यवस्था झाली नाही तर अनेकांची इतकी कुचंबणा होते, की ते मिनिटा-मिनिटाला “चहा-चहा’ म्हणत राहतात. काहींना तर चहा नसेल तर जागंच राहता येत नाही. एकसारखी झोप येते. चहा तयार करण्याच्या असंख्य पद्धती आपल्याकडे रूढ आहेत आणि सगळ्याच लोकप्रिय आहेत.
आलटून-पालटून, चव बदलून वेगवेगळ्या प्रकारे बनवलेला चहा पिणारे शौकीनही कमी नाहीत. याच चहाच्या तलफेचा हा एक अजब नमुना..! नागपूर जिल्ह्यातल्या खात गावातील आरोग्य केंद्रात नियुक्तीला असलेल्या डॉक्टरसाहेबांना चहा पिण्याची आतीव इच्छा झाली. कदाचित त्यांची ती नेहमीची चहाची वेळ असावी. परंतु सकाळपासूनच महिलांच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. त्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी आठ महिलांना बोलावलं होतं. चार महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आणि डॉक्टरसाहेबांनी चहा मागवला.
चहा येईपर्यंत त्यांनी उर्वरित चार महिलांना भूल दिली. शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी चहा प्यायचा, असं त्यांनी ठरवलेलं; पण चहा काही येईना. डॉक्टरसाहेबांचा माथा भडकला. त्यांना काही सुचेनासं झालं आणि भूल दिलेल्या महिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये तसंच ठेवून डॉक्टरसाहेब चक्क निघून गेले. महिलांसोबत आलेल्या नातेवाइकांना हा प्रकार समजल्यानंतर ते भीतीनं आणि काळजीनं ग्रस्त झाले. आता काय होणार? डॉक्टरसाहेबांनी शस्त्रक्रिया सुरू केल्या नव्हत्या, हेच संबंधित महिलांचं नशीब! पण भूल दिलेल्या अवस्थेत महिला तशाच पडून होत्या. नातेवाईक तरी काय करणार? डॉक्टरला देवाचा अवतार मानलं जात असलं, तरी त्याचा धावा करता येत नाही.
पुढच्या वेळी येताना या “देवा’साठी चहाचा नैवेद्य थर्मासातून आणायला हवा, असा विचार करत नातेवाईक स्वस्थ बसून राहिले.
घडलेला प्रकार ऐकताना विनोदी वाटत असला, तरी खूपच गंभीर आहे आणि त्याची तितक्याच गांभीर्यानं दखलसुद्धा घेतली गेलीये. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमलीये. त्यात वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरं तर समित्या, चौकशा यावर अनेकांचा विश्वास नसतो. तरीसुद्धा ही समिती योग्य प्रकारे चौकशी करून निर्णय घेईल, अशी आशा करूया. समितीतल्या सदस्यांच्या चहाच्या वेळा सांभाळल्या म्हणजे झालं!