– हिमांशू
“कायदा-सुव्यवस्था म्हणजे काय रे भाऊ?’ या प्रश्नाचं उत्तर “प्रत्येकाला सुरक्षित वाटण्याजोगं वातावरण’ हे असणं अपेक्षित आहे. परंतु सध्या सगळ्याच व्याख्या बदलल्यात. “स्वच्छता मोहिमे’अंतर्गत मोजक्यांच्या मागे ससेमिरा आणि मोजक्यांची “क्लीन चिट’ देऊन सफाई, हा कायदा राबवण्याचा पॅटर्न बनू पाहतोय. काय बोललं तर गुन्हा दाखल होतो, हे विसरून कोण बोललं तर गुन्हा दाखल होतो, हे लक्षात ठेवणं आवश्यक ठरतंय. कायदा मोडणं, कायदा हातात घेणं वगैरे सगळ्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहेत. अशा प्रकारे “निवडक साफसफाई’ केल्यानंतर उच्चपदस्थांचा उर्वरित वेळ शाब्दिक टोले-प्रतिटोले, सणसणीत चपराक, निशाणा साधणे, हल्लाबोल करणे, पोलखोल-गौप्यस्फोट करणे आदी महत्त्वाच्या कामांमध्ये खर्ची पडतो.
मग एखाद्या दिवशी वन परिक्षेत्र अधिकारीपदाची परीक्षा पास झालेल्या एखाद्या तरुणीचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी मिळतो. या घटनेतल्या संशयिताला अटक होते ना होते, तोच राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयता चालवला जातो. जवळच असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीत कर्मचारी नसतात. रस्त्यावरून जाणारे दोन युवक जीव धोक्यात घालून त्या मुलीला वाचवतात. हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतात. घटना घडत असताना पळून गेलेले लोक सोशल मीडियावर वाघ बनून गुरगुरू लागतात. काहीजण हल्ला झालेल्या मुलीची आणि हल्लेखोराची जात विचारतात. अखेर तरुणीला वाचवणारा शेतकऱ्याचा लेकच असे बुरशी लागलेले मेंदू झाडून साफ करतो.
कसला कायदा नि कुठली सुव्यवस्था? घराबाहेर पडलेली आपली मुलगी सुखरूप घरी पोहोचणारच, असा विश्वास वाटणं म्हणजे सुव्यवस्था. सोसायटीच्या पार्किंगमध्ये रात्री लावलेली आपली स्कूटर सकाळपर्यंत सुस्थितीत राहील याची खात्री म्हणजे सुव्यवस्था. कर्जाचे हप्ते फिटायच्या आत कुणी स्कूटर फोडणार-जाळणार असेल, तर कसली सुव्यवस्था? घरगुती कार्यक्रमात कुणीतरी जोरजोरात डीजे लावतो. एखाद्या वृद्धाला त्याचा त्रास होतो. तो संबंधिताला आवाज कमी करण्याची विनंती करायला जातो तर त्यालाच बेदम मारहाण केली जाते. अपमानानं अर्धमेला झालेला तो वृद्ध बंडगार्डन पुलावरून नदीत उडी घेऊन जीवन संपवतो.
कधीतरी एखादा स्वयंघोषित “भाई’ भररस्त्यात तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करतो. कधी एखाद्या इसमावर गोळीबार होतो. कधी एखादा रिक्षाचालक तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. केवळ दहशत माजवण्यासाठी वारजे, पर्वती, सहकारनगर, धनकवडी भागांत तरुणांची टोळकी आठवडाभरात शंभराहून अधिक वाहनांची तोडफोड करतात. पुण्यासारख्या शहरात पाच महिन्यांत सात कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडतात. या फक्त पुण्यातल्या घटना. नगर जिल्ह्यातल्या दरोड्यात झालेले दोन मृत्यू, कोल्हापुरातून लुटलेलं तीन किलो सोनं, वर्ध्यातले तीन दरोडे असे असंख्य गुन्हे!
गावागावात, गल्लीगल्लीत “कोयता गॅंग’ तयार होताहेत. अल्पवयीन मुलांच्या हातात घातक शस्त्रं येताहेत. कुठे चाललोय आपण? करायचंच म्हटल्यावर अशा घटनांचं सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय विश्लेषण करता येईल. पण तत्पूर्वी या समाजकंटकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण व्हायला नको का? आपल्या राज्यात गेल्या काही महिन्यांत दंगलींसह अनेक हिंसक घटना घडल्या. परंतु केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या विषयावर स्वतंत्र पत्रकार परिषद झाली? ज्यांनी ती करणं अपेक्षित आहे, त्यांनी पालघर साधू हत्याकांडावेळची स्वतःचीच वक्तव्यं आठवून पाहावीत.