– हिमांशू
नाव परमेश्वर. वडिलांचं नाव विठ्ठल. पण जगण्याच्या मूलभूत आवश्यकतांसाठीच घनघोर संघर्ष नशिबी लिहिलेला. मग स्पर्धेत उतरायचं कसं, धावायचं कसं आणि जिंकायचं तरी कसं? बेरोजगारीचा विषय निघाला, की अनेकांची बोटं जातात थेट शिक्षणव्यवस्थेकडे. आधुनिक गरजा लक्षात घेऊन ज्याची गरज आहे, तेच ज्ञान घेतलं पाहिजे असं सांगितलं जातं. सतत “अपडेट’ वगैरे राहण्याची गरज व्यक्त केली जाते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होत नसून, नोकऱ्यांचं स्वरूप फक्त बदलत आहे आणि नवीन स्वरूपाचं काम करायचं तर त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे, असं ज्ञानामृत पाजणाऱ्यांची संख्या कमी नाही. मग कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेणंच मुळात ज्यांना शक्य होत नाही, त्यांचा विषय पृष्ठभागावर येणार कसा आणि कधी?
परमेश्वर विठ्ठल चित्रे नावाचा सतरा वर्षांचा तरुण विष पिऊन जीवनाला पूर्णविराम का देतो? कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून! एका खासगी कॉलेजात अकरावीला शिकणारा हा मुलगा. वडील अल्पभूधारक शेतकरी. सगळी अस्मानी आणि सुलतानी संकटं झेलून या लोकांनी शेती करायची. हंगामाच्या तोंडावर कृत्रिम खतटंचाई निर्माण करणाऱ्या आणि बोगस बियाणं विकणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तींना तोंड द्यायचं. नंतर लहरी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा सामना करायचा. पाणीटंचाई, वीजटंचाई, पिकांवरची रोगराई वगैरे संकटांशी लढून जेवढं पीक हाताशी येईल, त्याचा चोरांपासून आणि जंगली जनावरांपासून बचाव करायचा.
शेतीमाल घेऊन बाजारात आलं की भाव पडणार, हे जणू ठरलेलंच! मग हिरमुसल्या चेहऱ्यानं शेतकरी घरी येणार आणि आपल्या सगळ्या गरजा “पोस्टपोन’ करणार. अशा घरात जन्मलेल्या पोरांना मार्केटच्या मागण्या लक्षात घेऊन नव्या गरजांनुसार फॅकल्टी निवडण्याचा फुकटचा सल्ला देणं म्हणजे एक प्रकारचं क्रौर्यच आहे. या पोरांना शिकावंसं वाटतंय, नोकरी मिळवून शेतीवरचा भार हलका करावासा वाटतोय, हेच खूप महत्त्वाचं आहे. पण कॉलेजची फी भरायचा विषय काढला, की वडील म्हणतात, “बेटा, सोयाबीनचं बिल आलं की देतो.’ परीक्षा तोंडावर आलेली, त्यामुळे फी भरणं तातडीचं झालेलं.
अशा कोंडीत सापडलेला परमेश्वर नावाचा तरुण मग विषारी औषधाची बाटली घेऊन शेतात जातो आणि स्वतःच्या आयुष्यावरच फुली मारतो, हे साक्षात् परमेश्वरालाही मान्य होणार नाही. नोकऱ्यांची जाहिरात निघाली की एका जागेसाठी शेकडो अर्ज येतात. त्यांच्याकडून भरमसाठ परीक्षा शुल्क घेतलं जातं. ट्यूशन लावण्याची ऐपत असलेले स्पर्धेत पुढं निघून जातात आणि कोणताच आधार नसलेले स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतात. पुढेही जाता येत नाही, मागे जाणंही अपमानास्पद ठरतं, तेव्हा हेच घडतं!
कुठे आरक्षणाचा तर कुठे कंत्राटी भरतीचा विषय गाजत असतो. आपल्या हालाखीला नेमकं काय आणि कोण जबाबदार आहे, याचा उलगडा पोरांना होत नसतो. असे असंख्य “परमेश्वर’ उंबरठ्याशी घुटमळतायत. उंबरठा ओलांडून त्यांना पुढे जायचंय. डोळ्यांत स्वप्नं आहेत, ती फार मोठी नाहीत. उन्हापावसात राबणाऱ्या, असंख्य अडचणी झेलणाऱ्या बापाला फक्त आधार द्यायचाय. शेतकऱ्याच्या घरातली ही तरुणाई रानातली ढेकळं तुडवून टणक झालीये. तरी जीवन संपवण्याइतकी हतबलता त्यांच्यात येतेय कुठून? कुणाला विचारायचं? परमेश्वराला?