– हिमांशू
उंदराची अनुवांशिक, जैविक आणि वर्तणूकविषयक वैशिष्ट्ये माणसासारखीच असतात आणि म्हणूनच संशोधक एखादा प्रयोग माणसावर करण्यापूर्वी उंदरांवर करतात. अन्नाच्या आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचे माणसावर काय परिणाम होतात, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम उंदरांवर प्रयोग करण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजे सुमारे दोनशे वर्षांपासून उंदीर प्रयोगशाळेत चाचण्यांसाठी वापरले जाताहेत. मुख्य म्हणजे, उंदरांच्या मेंदूची रचना आणि कार्यप्रणाली माणसाच्या मेंदूसारखीच असते म्हणे! त्यांची स्मरणशक्ती तल्लख असते आणि प्रजननक्षमताही अफाट असते. म्हणूनच माणसानं पिकवलेल्या अन्नधान्यावर झुंडीनं ताव मारणाऱ्या या प्रजातीचं समूळ उच्चाटन शक्य नाही, असं जगभरात मानलं जाऊ लागलंय.
उंदीर जास्तीत जास्त दोन वर्षे जगतो; पण तत्पूर्वी त्याला मारायचं ठरवलं तर आपल्याला अनेक खटाटोप करावे लागतात. त्यामुळेच भारतीय रेल्वे प्रशासनानं उंदरांचा मृत्यू महाग करून ठेवला असावा. एक उंदीर मारण्यासाठी रेल्वेला सरासरी दीड ते दोन हजार रुपये खर्च आला, असं रेकॉर्डवरून दिसतं. माहितीच्या अधिकाराखाली यासंबंधी मिळालेला तपशील धक्कादायक आहे. दरवर्षी रेल्वेकडून फक्त उंदीर मारण्यासाठी 23 कोटी रुपये खर्च केला जातोय. गेल्या पाच वर्षांत रेल्वेनं 62 हजारांहून अधिक उंदीर मारले. पेस्ट कंट्रोल मोहिमेअंतर्गत उंदीर मारण्याचा “दरडोई खर्च’ अधिक असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, अनेक रेल्वेच्या विभागांकडे यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील असला तरी त्यातून किती उंदीर मारले गेले, याचा आकडा उपलब्ध नाही.
ही माहिती धक्कादायक असली तरी नवीन नाही. मुंबईच्या महानगरी रेल्वेगाड्या, स्थानके आणि यार्डातले उंदीर मारण्यासाठी तीन वर्षांत 1 कोटी 52 लाख रुपये खर्च झाल्याचा तपशील 2019 मध्ये उपलब्ध झाला होता. एवढा अवाढव्य खर्च करूनसुद्धा पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाला फक्त 5 हजार 457 उंदीर मारण्यात यश आलं होतं. हे “हुशार’ उंदीर रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील वायरी कुरतडत असल्यामुळे हा खर्च किती आवश्यक आहे, हे पटण्याजोगं होतं. त्यावेळी उंदीर मारण्याचा रोजचा सरासरी खर्च 14 हजार रुपये होता आणि रोज सरासरी पाच उंदीर मारले जात होते.
ताज्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्ली विभागातच उंदीर मारण्याचा खर्च सर्वाधिक आहे. रेल्वेच्या काही विभागांमध्ये मारलेले उंदीर आणि झालेला खर्च यांचं प्रमाण इतकं व्यस्त आहे, की एका उंदराला मारण्याचा खर्च दोन हजारांच्या वर गेल्याचे दिसतेय. उंदीर आणि माणसातलं साधर्म्य प्रयोगशाळेत उपयोगी पडत असलं आणि उंदरांची पैदास वाढल्यामुळे माणसांचं अन्नधान्य फस्त होत असलं तरी एक विलक्षण विरोधाभास याक्षणी मनाला टोचतोय. उंदरांचा मृत्यू महाग आणि माणसं उंदराच्या मौतीनं मरतायंत!
मॅनहोलमध्ये सफाईसाठी कामगारांना उतरवायचं नाही, असे कोर्टाचे स्पष्ट आदेश असताना पुन्हा एकदा मुंबईच्या गोवंडी भागात दोन कामगारांचा गटारात विषारी वायूमुळे मृत्यू झाला. माणसाच्या अन्नावर हात साफ करणाऱ्या उंदराला मारायला दोन हजार रुपये आणि माणसाची घाण साफ करणाऱ्या कामगाराला साधं सुरक्षाकवचही नाही! 2018 च्या बातमीनुसार, तत्पूर्वीच्या तीन वर्षांत 221 सफाई कामगार मॅनहोलमध्ये उतरल्यामुळे जीवाला मुकले होते. तरी कंत्राटदारांची ही टोकाची बेफिकिरी इतक्या थंडपणे कशी खपवून घेतली जातेय?