– हिमांशू
दिल्ली हादरली. पुणं हादरलं. देशातली अनेक शहरं अधूनमधून अशीच हादरली. ज्यांच्या घरात तरुण पोरं-पोरी आहेत, ते पालक अनेकदा हादरले. पण चिंतेव्यतिरिक्त कुणीच काही केलं मात्र नाही. समाजधुरिणांनी “ब्र’ काढला नाही. उलट हल्लीची तरुण पिढी “अशी आहे, तशी आहे, तिच्या मागण्या वेगळ्या आहेत, आकांक्षा वेगळ्या आहेत, मानसिकता वेगळी आहे, अशी भाषा वापरून मनातल्या भीतीवर आशेचं पांघरुण घातलं. जे काही घडतंय तो “काळाचा महिमा’ आहे आणि आपण काहीही करू शकत नाही, अशी हतबलताच प्रत्येकानं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. संस्कारांची महती सांगणाऱ्यांकडेही हादरलेल्या पालकांना द्यायला उत्तर नाही. कुठे प्रियकर प्रेयसीला ठार मारतो तर कुठे प्रेयसी प्रियकराचा जीव घेते.
प्रेयसीच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवणारा प्रियकर पाहून आपण हादरलो. त्याच दिल्लीत पुन्हा एका प्रियकरानं प्रेयसीवर भररस्त्यात चाकूचे वीस वार केले. वार करताना तो सतत तिला लाथाही मारत होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला; पण कुणालाही न जुमानता तो तिच्यावर वार करतच राहिला. ती खाली कोसळल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात सहा वेळा दगड घातला. प्रेयसी एका बर्थडे पार्टीला चाललेली असताना प्रियकराने अचानक हल्ला करून तिला ठार केलं आणि पळून गेला. पोलिसांनी बुलंद शहरमधून त्याला ताब्यात घेतलं. जर त्याचं तिच्यावर प्रेम होतं तर अचानक त्याच्यात एवढं क्रौर्य आलं कुठून?
या घटनेपाठोपाठ पुण्याजवळ लोणीकंद परिसरात बरोबर उलट घटना घडली. प्रेयसीने प्रियकराचा निर्घृण खून केला. ती प्रियकराच्या खोलीवर अभ्यासाला गेली होती आणि तिथे त्या दोघांचं जोरदार भांडण झालं. भांडण एवढं वाढलं, की प्रेयसी स्वयंपाकघरात गेली आणि भाजी चिरण्याचा चाकू घेऊन प्रियकरावर वार करू लागली. दोघांची झटापट झाली आणि प्रेयसीही जखमी झाली. दोघेही पुण्यात शिकायला आलेले. परीक्षा तोंडावर आलेली. अभ्यास करताना त्यांच्यात अचानक एवढा गंभीर वाद कसा काय झाला? कोणत्या कारणावरून? आणि तो एवढ्या विकोपाला जाण्याइतपत काय बिनसलं असेल? वार प्रियकराने प्रेयसीवर केले काय किंवा प्रेयसीनं प्रियकरावर केले काय, दोन्ही घटनांवेळी प्रेम कुठे गेलं होतं? हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की बदलत चाललेल्या कुटुंब आणि समाजव्यवस्थेचा?
या दोन्ही व्यवस्थांना बदलून टाकणारी अर्थव्यवस्था आपल्याला खरोखर कळलीये का? या साऱ्या व्यवस्थांनी सरतेशेवटी आपल्या मूल्यव्यवस्थेलाही बदलून टाकलंय, हे आपल्या लक्षात येतंय का? मुलंमुली “प्रेमात’ पडताहेत की “रिलेशनशिप’मध्ये? दोहोंमध्ये नेमका काय फरक आहे? सगळंच बदललंय तर एकमेकांवर हक्क सांगण्याची वृत्ती का नाही बदलली? प्रेमभंगाच्या जखमांनी जन्मभर कळवळणारे प्रेमिक ज्या मातीनं पाहिले, तिथे “ब्रेकअप’ वगैरे शब्द इतके सहजपणे कसे उच्चारले जाऊ लागले? सांस्कृतिक अभिसरण वगैरे झालंय, तर मग मानसिकता का नाही बदलली? कारण मूळच्या बुरसटलेल्या विचारांवर तथाकथित आधुनिकतेचं कलम झालंय, तेसुद्धा व्यापारीमार्गानं. या प्रक्रियेत जे काही घडून आलंय तो “संकर’च म्हणावा लागेल. बाइकप्रमाणं आपल्याला रिलेशनशिपसुद्धा शानदार दिसणारी, जोरदार पळणारी आणि जास्त मायलेज देणारी हवीये. पण… स्वतःमध्ये डोकावयाला सवड कुणाला आहे?