हिमांशू
मज्जा! पुन्हा एकदा भूकंप होणार. कुणी काही म्हणो, अस्वस्थता आहेच आणि ती लपून राहात नाही. मुंबईत यांची आणि त्यांची भेट झाली की नाही? बातमी खरी की खोटी? मुंबईतल्या भेटीची बातमी एखाद्या वेळी संबंधितांना खोडून काढता येईल हो; पण पुण्याचा दौरा अचानक रद्द कसा काय झाला? नागपुरात काय घडलं? “सगळेच आपल्यासोबत येणार,’ हे वाक्य इतक्या खात्रीनं कसं उच्चारलं गेलं? डोकं खाजवा मराठीजनहो, हाताला काम नसलं तरी नुसते बसून राहू नका. विचार करणं हेही महत्त्वाचं काम आहे. कधी यांच्या तर कधी त्यांच्या मोर्चाला गर्दी करणं, कधी यांच्या तर कधी त्यांच्या सभांना गर्दीचे उच्चांक मोडत राहणं, एवढंच काम नाहीये आपलं.
संगीत वाजू लागलंय. पुन्हा एकदा संगीत खुर्ची सुरू झालीये. संगीत अचानक थांबेल तेव्हा कोण कोणत्या खुर्चीवर जाऊन बसेल? कुणाला खुर्चीच मिळणार नाही? कुणाच्या शेजारी कोण जाऊन बसलेला दिसेल? असे एकाहून एक उत्कंठावर्धक प्रश्न संगीताबरोबर राज्यभर पसरत चाललेत. या संगीताची सांगता मोठ्या भूकंपानं होणार आहे. कुणी म्हणतो, एकच भूकंप होणार. कुणी म्हणतो, दोन होणार. खराखुरा भूकंप पूर्वसूचना न देता येत असला तरी राजकीय भूकंप वाजतगाजत येतो. आपला महाराष्ट्र आता “भूकंपप्रवण’ म्हणूनच जाहीर करायलाच हवा. हा भूकंप मजेशीर असतो; मनोरंजक असतो!
पाऊस फार बोअर असतो. अवकाळी तर फारच बोअर! ऊठसूठ नुकसानीचे पंचनामे, आर्थिक मदत, पीकविम्याचे पैसे वगैरे शब्द चघळायला सुरुवात होते. खरंतर ज्या विषयांना अजिबात टीआरपी नाही, ते बंदच केले पाहिजेत. शेतीचं नुकसान ही आता दरमहा घडणारी घटना झालीये. शेतीमाल बाजारात आल्याबरोबर भाव पडणं, हेही काही नवीन राहिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय जुना झाला, असं बेधडक म्हणणाऱ्या नेत्यांची नवी जनरेशन आता तयार झालीये, दहा मिनिटांत नुकसानीची पाहणी पूर्ण होतीये, ही विकासाची लक्षणं नाहीत का? “चाळीस सह्यांचं पत्र’ हाच चर्चेचा विषय असायला हवा आणि तो मनोरंजक होण्यासाठी काही प्रश्न ऑप्शनला टाकायला हवेत.
उदाहरणार्थ, कोण कुणाबरोबर गेल्यास तत्त्वं पायदळी तुडवली जातात? कोण कुणाबरोबर गेल्यास ताकद वाढते? कोण कुणाबरोबर गेल्यास ती गद्दारी ठरते? कोण कुणाबरोबर गेल्यास ती मजबुरी ठरते? कोण कुणाबरोबर गेल्यास ती राजकीय परिपक्वता ठरते? कोण कुणाबरोबर गेल्यास ती राजकीय आत्महत्या ठरते? या भानगडी हद्दपारच केल्या पाहिजेत. ज्याप्रमाणं शेती आणि शेतकरी हा मुद्दा राहिलेला नाही, त्याचप्रमाणं भ्रष्टाचार हाही मुद्दा राहिलेला नाही. कोण कुणाबरोबर आहे, यावर तो भ्रष्टाचारी आहे की नाही हे ठरतं, हे अंगवळणी पाडून घ्या मराठीजनहो..! राजकारणात एका झटक्यात जसं नशीब बदलतं तशीच इमेजसुद्धा रातोरात बदलते. पत्रावर सह्या असलेल्या चाळीस लोकांना काय मिळणार आणि आधीच्या चाळीस जणांचं काय होणार की, नुसत्याच अफवा पेरल्या जाणार हे महाराष्ट्रापुढचे आजघडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.