– हिमांशू
काळाबरोबर जशी समाजव्यवस्था बदलते तशीच मूल्यव्यवस्थाही बदलते, हे मान्य केलं तरी हा बदल अखेर आपल्यावरच उलटणार नाही, याची खबरदारी समाजातल्या प्रत्येकानं घ्यायची असते. उदाहरणच घ्यायचं झालं तर अहिंसेचा विचार आज अनेक कारणांनी मागे पडलेला दिसतो. वीरश्रीनं ओतप्रोत भरलेले अवास्तव चित्रपट पाहून आणि डेटा स्वस्त असल्यामुळे सोशल मीडियावर केली जाणारी भडक वक्तव्ये वाचून रक्त उसळणं स्वाभाविक असलं तरी त्यामुळे निर्माण होत असलेल्या मानसिकतेच्या अंतिम परिणामांचा विचार आपण करतो का? हा मुख्य प्रश्न आहे. हैदराबादच्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींचा एन्काउंटर असो वा अतिक अहमदसारख्या माफियाचा नुकताच झालेला खून असो, समाजमनात “इन्स्टंट जस्टिस’चं पारडं एवढं जड झालं, की तारतम्याला जागाच उरली नाही.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंसेचं समर्थन करण्याची मानसिकता वाढत असली, तरी याच हिंसेची आग उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहे, याचं सुज्ञ भान असावं लागतं. पडद्यावर हिंसा पाहून ज्यांच्यात वीरश्री संचारते, त्यांनी भररस्त्यात एकदा जरी अस्सल हिंसा पाहिली तरी त्यांची बोलती बंद होते. शिक्षणासाठी घराबाहेर किंवा शहराबाहेर गेलेली आपली मुलं चुकून दंगलीत सापडली तर? असा विचार जरी मनात आला तरी उन्मादाचा पारा झटक्यात खाली येतो. असले वाईटसाईट विचार मनात आणायचेच नाहीत, असा “पॉझिटिव्ह’ निर्धार असणाऱ्यांनी किमान सुदानमध्ये काय घडतंय हे डोळसपणे पाहायला काय हरकत आहे?
आफ्रिकेतल्या या महत्त्वाच्या देशात यादवी युद्ध सुरू आहे आणि त्यात सातशे नागरिकांचा हकनाक बळी गेलाय. लढाई चाललीय लष्कर आणि निमलष्करी दलात. मरतायत माणसं… आणि मुख्य म्हणजे मृतांमध्ये 130 लहानग्यांचा समावेश आहे. युद्ध म्हणजे काय आणि ते कशामुळे होतं, हे ज्यांच्या गावीही नाही त्यांनी विनाकारण का मरावं? लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुरहान आणि निमलष्करी दलाचे प्रमुख महंमद हमदान दगालो यांचा अहम् सुखावण्यासाठी? सुदानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं पाहिजे, असं लष्करप्रमुखांचं म्हणणं आहे तर दहा वर्षे तरी लोकशाही सरकार असू नये, असं निमलष्करी दलाच्या प्रमुखांचं म्हणणं आहे.
हे मतभेद इतके विकोपाला गेले, की युद्धालाच तोंड फुटलं. कोणतंही बाह्य आक्रमण झालेलं नसताना बॉंबवर्षावात घरं जमीनदोस्त होऊन लाखो लोक बेघर झालेत. सुदानच्या गृहयुद्धाशी संबंधित एक ताजा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. अनाथाश्रमातल्या मुलांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळालं नाही आणि 60 मुलं तडफडून मरण पावली… अस्थिर वातावरणात घरापेक्षा अनाथाश्रम अधिक सुरक्षित, म्हणून आईवडिलांनी आणून सोडलेली!
सुदानमध्ये किमान 13 लाख मुलांना तातडीनं अन्नपाणी पुरवण्याची गरज आहे. पण युद्धामुळे गरजेच्या वस्तूंचा पुरवठाच विस्कळीत झालाय. गोळ्या खाऊन, बॉंबस्फोटांमध्ये छिन्नविच्छिन्न होऊन किंवा तहान-भुकेनं तडफडून मरण्याचं त्यांचं वय नाही. पण अनेकदा शस्त्रसंधी होऊनसुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये समेट होत नाही आणि संपूर्ण देश त्याची किंमत मोजतोय. जगातले बहुतांश संघर्ष अहंकारामुळे झाले, याची उदाहरणं आपल्याला रामायण, महाभारतापासून सापडतात; पण सामोपचाराने प्रश्न सोडवायची शक्ती असूनसुद्धा हिंसेचं समर्थन करावंसं का वाटतं आपल्याला?