निगडी, (वार्ताहर) – खरा गझलकार बेहिशेबी असतो! गझल आकलनासाठी सोपी असावी. शब्दार्थाच्या पलीकडे जाऊन कवींनी नित्यनूतन लिहून जगाला कवेत घेण्याचा प्रयत्न करावा, असे विचार माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.
शांता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, निगडी प्राधिकरण येथे संमेलनात पांढरपट्टे बोलत होते. स्नेहल आर्टस् अॅण्ड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन घेण्यात आले. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. तसेच डॉ. इक्बाल मिन्ने, सुनंदा पाटील, रघुनाथ पाटील, राजन लाखे, कल्पना गवरे, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे उपस्थित होते.
अतुल दिवे आणि वैशाली राजेश यांनी संमेलनातील सहभागी गझलकारांच्या रचनांचे सुश्राव्य सादरीकरण केले. त्यामध्ये तुझ्या लाजण्याचा इशारा पुरेसा…, मनाप्रमाणे जगून घे…, साथ दे तू मला…, आयुष्य छान आहेच…, येथे मनाप्रमाणे जगता कधीच न आले…, लाजून हसण्याचा हव्यास होता…, अशा रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीकृष्ण ढोबळे (तबला) आणि नितीन खंडागळे (की बोर्ड) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगला पाटसकर (साहित्य), डॉ. मनाली वैद्य आणि डॉ. शैलजा माने (वैद्यकीय), कल्पना गवरे (शैक्षणिक) यांना सन्मानित करण्यात आले. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, सुहासिनी शिरढोणकर, मकरंद गोंधळी, पांडुरंग कुलकर्णी, दीपक पटेकर उपस्थिती होते.