उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रिक्षाला अज्ञात चारचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेत एकजण जागेवरच ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी फाटा परिसरात रविवारी (ता. १२) सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
भानुदास गोरे (वय अंदाजे- ५०, रा. थेऊर, ता. हवेली, मूळ रा. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनीता जगताप व इंदू जगताप (रा. दोघीही, बेलसर, ता. पुरंदर) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. तर विष्णू राजाराम अंधारे व छाया अंधारे (रा. दोघेही सोरतापवाडी, ता. हवेली) असे किरकोळ जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून हडपसरवरून उरुळी कांचनच्या दिशेने एक रिक्षावाला निघाला होता. या रिक्षात ५ प्रवाशी प्रवास करीत होते. सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास रिक्षा सोरतापवाडीतून उरुळी कांचनच्या दिशेने निघाली असताना अचानक सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षात बसलेल्या ५ प्रवाश्यांना गंभीर दुखापत झाली. सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठान व लाईफ केअर यांच्या रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील झेडप्लस व सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले.
दरम्यान, या अपघातात बनुदास गोरे यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींवर सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.