वाल्हे (पुणे)- येथील महर्षि वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी तपोभूमित पारंपरिक दसरा सण सीमोल्लंघन करत, सोने लुटत, नाथसाहेबांच्या नावाचा जयघोष करत उत्साहात दरवर्षी साजरा होत असतो. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये शुक्रवारी (दि.23) ग्रामस्थ व मानकरी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वाल्हे गावाला पूर्व परंपरा चालत आलेली परंपरा खंडीत होऊ नये म्हणून, काही ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये आरती व सोने (आपट्यांची पाने) पुजनाचा कार्यक्रम होणार आहे. असा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थ व मानकरी यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अमोल खवले, दिलीप पवार, शशिकांत दाते, बबन भुजबळ, साहेबराव पवार, प्रवीण भुजबळ, प्रताप पवार, सदाशिव भुजबळ, दत्तात्रय पवार, बाळासाहेब पवार, बजरंग पवार, नीलेश कुंभार, भैरवनाथ मंदिराचे पुजारी बाबा आगलावे, सचिन आगलावे आदी उपस्थित होते. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व मंदिरे बंद ठेवली आहेत. अनेक भाविक भक्त शासनाच्या निर्णयावर नाराज आहेत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.