- प्रकल्प अहवाल तयार; इंटरसेप्टर सिव्हर लाइनचे काम संथ
पिंपरी – सध्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या पवनेच्या पाण्याला चांगलाच वेग दिसत आहे. परंतु पवना नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचा वेग मात्र खूपच संथ आहे. नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी संपूर्ण नदीचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. कामाचे आदेश देऊन सुमारे एक वर्ष होत आहे. परंतु अद्याप हद्द निश्चितीचे कामही पूर्ण झाले नाही. तसेच इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचे तसेच नाल्यांवर मेकॅनिकल जाळी बसविण्याचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे.
पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहते. नदीचे रावेत ते सांगवी या शहरी भागातील अंतर सुमारे 20 किलोमीटर इतके आहे. नदीपात्रात प्रक्रिया न होता नाल्यांद्वारे थेट सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे. तथापि, महापालिका प्रशासनाचा मात्र 80 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केला जात असल्याचा दावा आहे. शहरातील औद्योगिक वसाहतींतून देखील नदीपात्रात रसायनयुक्त पाणी मिसळते. त्यामुळे नदीपात्रात मासे मरण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पवना प्रदूषणाचा प्रश्न त्यामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे.
नदीचे वाढते प्रदूषण आणि जलचरांच्या अस्तित्त्वाला निर्माण झालेला धोका ही बाब लक्षात घेता पवना नदी पुनरूज्जीवन प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागार एच.सी.पी. प्लॅनिंग प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) यांची नेमणूक केली आहे. सल्लागाराने प्रकल्पाचा भाग म्हणून संपूर्ण नदीचे सर्वेक्षण करून नदी पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रकल्प पाहणी अहवाल तयार केला आहे.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी, जैवविविधता अबाधित राखण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने अंदाजे 32.85 किलोमीटर लांबीची इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तसेच 14 नाल्यांवर मेकॅनिकल जाळी बसविण्यात येणार आहे. त्याशिवाय, नाल्यांमधून वाहणाऱ्या तरंगत्या वस्तू नदीत जाण्यापूर्वी काढण्यात येणार आहेत. या कामांचा एकत्रित समावेश करून त्यासाठी निविदा काढण्यात आली.
वर्ष उलटत आल्यानंतरही अपुरा वेग
पवना नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी 96 कोटी 81 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. या कामासाठी 19 सप्टेंबर 2019 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. काम सुरू होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटत आला आहे. प्रकल्पात भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चित केली जाणार आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. पर्यायाने, हद्द निश्चित करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. दापोडी ते कासारवाडी या भागात आजअखेर 1.06 किलोमीटर इतक्या अंतरात इंटरसेप्टर सिव्हर लाइनचे काम झाले आहे. 13 चेंबर बांधून तयार झाले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि पावसामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्याने कामाला अद्याप पुरेसा वेग आलेला नाही. काम पूर्ण करण्यासाठी 18 मार्च 2022 पर्यंत मुदत आहे. मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.