मुंबई –आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत होणार असे बीसीसीआयने जाहीर केले असले तरीही अद्याप त्यांच्यासमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे चेंडू आता केंद्राच्या कोर्टात असून यावर काय निर्णय होणार यावरच स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलियात होणारी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा रद्द झाल्यानंतर आयपीएल होणार असे संकेत मिळाले. मात्र, करोनाचा धोका असताना ही स्पर्धा देशाबाहेर आयोजित करणे वाटते तितके सोपे नाही. दरवर्षी या स्पर्धेच्या आयोजनासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो.
यंदा मात्र केवळ दोन महिन्यांत ही स्पर्धा आयोजित करण्याचे आव्हान बीसीसीआयसमोर आहे. स्पर्धेतील सर्व संघांना तसेच सपोर्ट स्टाफ, पंच व संबंधित सर्व लोकांना अमिरातीत 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी लक्षात घेऊन आधीच घेऊन जावे लागणार आहे. तसेच या कालावधीतील त्यांचा खर्च, अमिराती क्रिकेट संघटना व त्यांचे सरकार यांना द्यावा लागणारा समभाग या व अशा कितीतरी गोष्टी बीसीसीआयला सोडवाव्या लागणार आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षाही भारत सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे.