मुंबई: राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी झालेले राजकीय डावपेच इतिहास जमा आहेत. कारण त्या डावपेचांची चर्चा आजही राजकीय वर्तुळात जिवंत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली त्यावेळी हा विषय पुन्हा रंगला.
भाजपकडे संख्याबळ कमी होते आणि मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युती तुटली अशावेळी कट्टर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षातील आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन देवेंद्र फडणवीसांसमवेत पहाटे राज्यपालांकडे गेले. शपथविधी सोहळा उरकला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र हे सरकार एका दिवसाचेच राहिले. कारण दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडीची स्थापना झाली होती.
दरम्यान, मुलाखतकार राजू परुळेकर यांनी फडणवीसांना जर तुम्हाला काही बदलायची संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी बदलाल का? असा प्रश्न विचारला.
यावर फडणवीस म्हणाले, जीवनात अशा शंभर घटना असतात, ज्या आपल्याला बदलल्या पाहिजेत असं वाटतं. पण त्या शंभर घटना आपण बदलू शकत नाही. त्यामुळे हे बदलेन किंवा ते बदलेन हे निवडणं कठीण आहे. मला कपटी क्रूर व्हायचं नाही. तसा मी नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण मला नेहमी अस वाटतं की मला हे मिळवायचे आहे किंवा ते माझ्या जीवनात नाही. हे केवळ सत्तेसाठी नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.