गिरिडीह- झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात एका आईने स्वतःच्या तीन मुलांना खोक्यात बंद करून जिवंत जाळले. त्यानंतर स्वतःलाही आग लावली. उपचारादरम्यान आईचाही मृत्यू झाला.
घरात दूध देण्या-घेण्यावरून झालेल्या वादातून महिलेने हे पाऊल उचलले.
मात्र या महिलेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, तिच्या मुलीचा आणि नातवांचा खून करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेचा पती शेतात काम करीत होता. गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार या गावात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, महिलेच्या घरी दूध देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. यावर पंचायतही बोलवण्यात आली होती. त्यावेळी महिलेच्या माहेरच्या माणसांना बोलवण्यात आले होते. यामुळे ही महिला नाराज झाली होती.
मंगळवारी सकाळी रोजच्यासारखे तिचा पती शेतात काम करायला गेल्यावर त्याच्या पाठीमागे महिलेने पोटच्या दोन मुले आणि एका मुलीला जिवंत जाळून स्वतःलाही आग लावली. आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. लोकांनी कशीतरी आग विझवली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.