नागपूर: नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यासह अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा टोळधाडीने आक्रमण केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये शनिवारी टोळधाड दाखल झाली आणि भाजीपाल्यासह हिरव्या झाडांचे नुकसान केले. याबाबत माहिती मिळताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री 10 वाजता पाहणी केली.
यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे कमीत कमी नुकसान झाले पाहिजे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. टोळधाडीचा आक्रमणापासून होऊ शकणारे पिकांचे नुकसान कमी होण्यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहून धुर करून, फटाके फोडून वा बॅंड वाजवून टोळधाडीला पळवून लावण्याचा सल्लाही गृहमंत्र्यांनी दिला.