सांगली (प्रतिनिधी) – वाळू प्रकरणी करण्यात आलेल्या दंडाच्या कारणातून विट्याचे तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना शिवीगाळ व मारहाण करून पळून गेलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार सुभाष पाटील (वय 37, रा. भाळवणी) व त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील 19 वर्षांचा साथीदारास सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली.
चंद्रहार पाटील याच्या वाळू वाहतूक गाड्यांवर कारवाई करून शेळके यांनी लाखो रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड कमी करण्याची मागणी चंद्रहार पाटील याने केली होती. मात्र, शेळके यांनी पूर्ण दंड भरायला सांगितले होते. त्यानंतर चंद्रहार पाटील व त्याच्या साथीदाराने दि.3 मे रोजी विटा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार शेळके व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली होती.
या घटनेनंतर दोघांनी पलायन केले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते. पाटील व त्याच साथीदार हे रविवारी दिघंची-पंढरपूर रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.