अकोले – पोलीस कायदा कलम अन्वये संगमनेरमध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी तीन दिवसांचा पूर्णपणे लॉकडाऊट केला. त्याच धर्तीवर अकोले तालुक्यात सुद्धा दक्षता घेतली जात आहे. आढळा पट्ट्यामध्ये आज सकाळी निवडक गावांना प्रस्तुत प्रतिनिधीने भेटी दिल्या असता, तेथील गावबंदी आणि गावातील तरुणांची करोनाच्या प्रतिबंधासाठी असणारी जागरूकता म्हणजे एक अलौकिक अशाप्रकारची वज्रमूठ आढळली.
त्यांच्याच भाषेत सांगायचे गेले, तर खबरदार जर टाच मारुनी जाल आता पुढे डोंगरगाव हे अकोले तालुक्याच्या शेवटचे गाव. शेजारी सिन्नर तालुका, संगमनेर तालुका. या दोन्ही तालुक्यांना जाणाऱ्या वाटा बोरीच्या फासांनी त्यांनी बंदिस्त केलेल्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याकडे तेथील तरुण कुठे चाललाय? पासून काय काम आहे ? कुणाकडे जायचे आहे? या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर दिल्यास शिवाय गावात शिरकाव करू दिला जात नव्हता. ही खऱ्या अर्थाने या तरुणांची करोनाच्या बाबत असणारी संवेदनशील जागरुकता होती.
हिवरगाव आंबरे, गणोरे, देवठाण, वीरगाव याठिकाणी सर्वच व्यवहार थंडावलेले आढळून आले. या प्रत्येक ठिकाणी तोंडाला मास्क बांधलेले तरुण, दुकानाचे शटर डाऊन आणि प्रत्येक जण आपापल्या घरांमध्ये आढळला. रस्ता निर्मनुष्य आणि ग्रामीण भाषेत सांगायचे गेलेत तर रानातही चिटपाखरू नाही आणि गावातही वाटसरू नाही असेच चित्र होते. आढळा खोऱ्यातील वीरगाव येथे सर्वत्र सामसूम आढळून आले.सरपंच नवनाथ कुमकर, भाजपचे नेते जालिंदर वाकचौरे, दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे आदींच्या दक्षतेमुळे आज गावात शुकशुकाट होता.
सावरगाव पाट येथे तरुणांच्या पुढाकाराने सर्वच गाव बंद होते. तर समशेरपूर फाटा ते समशेरपूर गाव येथेही वाहतूक ठप्प व माणसांची वर्दळ स्तब्ध असे त्याचे वर्णन करावे लागेल. प्रत्येक व्यक्तीला गावात प्रवेश करताना समशेरपूर याठिकाणी गावाच्या बाहेर पाण्याची सोय करून दिली आहे. हॅंडवॉश केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या हालचालीवर स्थानिक लोक नजर ठेवत आहेत.
किंबहुना येणाऱ्या – जाणाऱ्याची ती अलिखित अशा प्रकारची यादीच वाचावी, अशा प्रकारचे चित्र दिसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असणाऱ्या काव्यपंक्ती येथे उद्धृत करणारी स्थिती निर्माण झाली होती. खबरदार जर टाच मारुनी… जाणीपूर्वक उल्लेख करण्याची गरज या निमित्ताने आढळली कारण की आतापर्यंत ठीक ठिकाणच्या तरुणांना नावे ठेवण्यातच प्रसारमाध्यमांनी आपल्या ओळी खर्च केल्या. पण आजचे चित्र मात्र यापेक्षा भिन्न होते.