कुटुंबियांकडून नावानिशी पोलिसांत फिर्याद दाखल
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बिज्नोर येथे सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का) सुरू असलेल्या निदर्शना दरम्यान पोलिसांनी एका 20 युवकाची हत्या केली, अशी फिर्याद त्याच्या कुटुंबियांनी सहा पोलिसांविरोधात दाखल केली आहे.
निदर्शने सुरू असताना पोलिसांनी या 20 वर्षीय तरूणाची गोळ्या घालून हत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. याबाबात पोलिस अधिक्षक (ग्रामीण) विश्विजित श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेला युवक सुलेमान याचा भाऊ शोएब याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी हवालदार मोहित यांच्या नावाचा उल्लेख गोळी घालणारा म्हणून केला आहे. या फिर्यादीचा तपासही हिंसाचार पसरावणाऱ्यांच्या विरोधातील फिर्यादीसह सुरू राहील. या प्रकरणी कोणताही पक्षपातीपणा न करता तपास करण्यात येईल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमानचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला आहे. मात्र सुलेमान हा दंगलखोर जमावात होता. हा जमाव पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत होता. स्व संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो मरण पावला. बिज्नोरमध्ये काही निदर्शकांनी पोलिस अधिक्षकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या हवालदाराने ती अंगावर झेलली. त्यानंतर त्याने उलट दिशेने गोळीबार केला. मात्र जमाव पांगवण्यासाठी गोळीबार करण्याचा कोणताही आदेश दिला नव्हता, असे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी म्हटले आहे.