झाडाझडुपांचे साम्राज्य : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची मागणी
सोरतापवाडी- पूर्व हवेलीतील शेतीला वरदान ठरलेला बेबी कालवा तीन वर्षांपासून पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी व नागरिकांना कालव्यामुळे आता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, नायगाव, शिंदवणे, उरुळी काचंन आदी गावांतील व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्यामुळे सोनेरी दिवस आले होते. शेतीसाठी हा कालवा वरदानच ठरला होता. कालांतराने नवीन कालवा सुरू झाल्यामुळे हा कालवा बंद पडला.
2007 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा कालवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाल केल्या. मुळा- मुठा नदीतून पाणी पंपाद्वारे मुंढवा येथून उचलून पाईपलाइनद्वारे हडपसर येथील साडेसतरा नळी येथे कालव्यात सोडले. हवेली, दौंड भागातील शेतीला हे पाणी वरदानच ठरेल असे वाटत होते. परंतु हा कालवा सुरू होऊ शकला नाही. हा कालवा तत्कालीन भाजप सरकारने 2016 रोजी सुरू केला. पण दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाने पुर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व जलपर्णीची वाढ झाली आहे.कालव्याच्याकडेने काटेरी बाभळीची वाढ होऊन कालव्यावरील रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे फुले, भाजीपाला, ऊस नेण्यासाठी व नागरिकांना जाण्या येण्यासाठी अडचणीचा ठरत आहे.
कालव्यावरील हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याअगोदर कालव्यातील जलपर्णी काढणे व कडेने उगवलेली झाडे झुडपे काढणे आवश्यक होते. परंतु ती काढली नाही. त्यामुळे पाणी सोडल्याने काही ठिकाणी कालव्याचा संपूर्ण भागच जलपर्णीने व्यापला आहे. काही ठिकाणी कालव्यातील पाणीच दिसत नाही. फक्त जलपर्णीच दिसत आहे. त्यामुळे प्रवाहाला अडथळा ठरत आहे. कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाण्याचा फुगवटा वाढून काही ठिकाणी पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाझरत आहे. कालवा परिसरातील पाणी दूषित झाले आहे. पिण्यायोग्यही राहिले नाही. कालव्यात कचरा व मृत जनावरे टाकत असल्यामुळे ती पाण्यात वाहून न जाता जलपर्णीत अडकत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहेत. भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्री पिसाळत आहेत. जलपर्णीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मध्यंतरी कालवा बंद असल्यामुळे पाटबंधारे खात्याने कालव्यातील जलपर्णी काढण्याची मागणी होत आहे.
- पाटबंधारे विभागाने बेबी कालव्यातील जलपर्णी व कडेची झाडे तोडून लवकरात लवकर कालवा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतीला पाणी देण्यास अडचणी येणार नाही.
– आण्णा चौधरी, प्रगतिशील शेतकरी, सोरतापवाडी