अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील
मंचर-पुणे-नाशिक महामार्गावर तीन ते चार ठिकाणी वाहतूकीचा नेहमीच प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी दिले.
मंचर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन व ग्रामस्थ, दक्षता कमिटी व पोलीस पाटील यांच्यासमवेत परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांनी शुक्रवारी (दि. 20) बैठक बोलावली होती. या बैठकीत मंचर ग्रामस्थांकडून अण्णासाहेब आवटे कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय, मंचर बाजार समिती, मुळेवाडी रस्ता या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊन मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नेहमीच असते. अण्णासाहेब आवटे व महात्मा गांधी विद्यालय याठिकाणी बसस्थानकापासून विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते. त्यासाठी काही पर्याय शोधता येईल का असे ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पिंपळगाव चौकात वाहतूक तसेच रांजणी, बेल्हे, पिंपळगाव बाजूने येणारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. सरपंच दत्ता गांजाळे यांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे. मुळेवाडी रस्त्यावर मंचर शहराची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे विद्यार्थी सदर रस्त्याचा वापर करत असल्याने याठिकाणी वॉर्डन नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सरपंच दत्ता गांजाळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने रस्ता वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना मदत केली जाईल. मंचरचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या कामकाजाबाबत उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शांतता समितीचे अध्यक्ष युवराज बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, मंसूर खान पठाण, शेख मुनीर चॉंद शेख, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ नवले, संतोष बाणखेले आदी उपस्थित होते.