वातावरण बदलामुळे शेतकरी अडचणीत
राजेगाव- दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बोरीबेल, काळेवाडी, मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, स्वामी चिंचोली आदी भागांत अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मका, कांदा, ज्वारी, भुईमूग आदी पिकांच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच दौंड तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांत कमालीचा वातावरणात बदल झाल्याने रब्बी हंगामातील पिके पुन्हा विविध रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी आणि खर्चिक ठरला. खरिपातील मका, बाजरी, कांदा आदी पिके अवकाळी पावसाने खराब झाली, सडून गेली. असे असूनही येथील शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली आहे. मात्र, वातावरण सातत्याने बदलत असल्यामुळे रब्बीचे पीक पण जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. महागडे बियाणे आणून पिकांची लागवड केली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांत वातावरण बदलामुळे रब्बी पीकही धोक्यात आले आहे.
कांदा रोपांना सोन्याचा भाव
कांद्याला चांगला दर मिळत असल्याने उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसत आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याने रोपे सडून गेली आहेत. मात्र कांदा दर टिकून असल्याने कांदा रोपांचे दर गगनाला भिडले असून रोपांना सध्या सोन्याचे दिवस आले आहेत. मिळेल त्या किमतीत कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड केली जात आहे. मात्र वातावरण बदलामुळे शेतकरी कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत
- मजुरीचा खर्च वाढला
दौंड तालुक्यात कांदाच्या लागवड सुरू असून कांद्याला अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी पीक वाचवण्यासाठी कसरत करत आहे. बदलत्या हवामानामुळे कांद्याचे उपन्न घटले आहे आणि रोप लावण्यासाठी एकरी दहा ते बरा हजार मजुरी मोजावी लागत आहे. त्यात रोपांचा आणि औषधांचा खर्च बघितला तर शेतकऱ्याला ते परवडणारे नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. - अवकाळी पावसाने खरीप हंगाम गेल्यावर रब्बी लागवड केली आहे; पण राजेगाव परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू व कांदा पिकांवर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे आणि फवारणी करूनही पीक चांगले येत नसल्याने काळजी वाटत आहे.
मंगेश डंगाने, शेतकरी, राजेगाव