एकलहरे येथे नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची केली पाहणी
मंचर – एकलहरे (ता. आंबेगाव) येथे प्रत्यक्ष बांधावर जात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडल्या.
डॉ. दीपक म्हैसकर म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात भात,द्राक्ष व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसानभरपाई देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि विमा कंपन्यांची चर्चा झाली आहे.तसेच सर्व नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवून देण्यात येईल व राज्यशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र डूडी, कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तहसीलदार रमा जोशी, माजी उपसरपंच नवनाथ शिंदे, ग्रामसेवक गणेश राजगुरू, तलाठी हेमंत भागवत, राहुल डोकेणे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, कृषी सहायक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी प्रमोद विठ्ठल भालेराव यांच्या सोयाबीन, प्रकाश विठ्ठल भालेराव यांच्या ज्वारीचे, वासुदेव, मुकुंद आणि धनंजय महादेव भालेराव या तिन्ही भावांच्या फ्लॉवर पिकांची तर जयश्री बाळू डोके यांच्या सोयाबीन पिकांची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली.