श्रीगोंदा (प्रतिनिधी) –नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यात यावा.त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनातर्फे तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करील. तसेच लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले असून, लिंबू पिकाचा पीकविम्यात समावेश करावा, अशी मागणी आमदार राहुल जगताप यांनी केली आहे.
आ. जगताप यांनी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशीच्या पिकाची पाहणी केली. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आ. जगताप यांनी श्रीगोंदा शहरालगतच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली असता, संपूर्ण कपाशीचे नुकसान झाल्याचे आढळून आले.
तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले न भरल्याने त्यांची जोडणी पुढील पीक येईपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तोडू नये, असे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी ही यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीची पाहणी करून अहवाल द्यावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांची पूर्ण कर्जमाफी करावी, पुढील पिकासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि बिलांची वसुली थांबवावी, या मागण्या सरकारकडे करणार असल्याचेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.