बॅंकॉक: हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी आशियातल्या देशांनी ऊर्जेसाठी कोळशाचा वापर थांबवावा असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनिओ गुटेरस यांनी दिला आहे. ते आज थायलंडची राजधानी बॅंकॉक इथे वार्ताहरांशी बोलत होते. जागतिक हवामान बदलाच्या झळा सोसणाऱ्या देशांनी तर या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात पुढे राहील पाहिजे असेही ते म्हणाले.
आशियाई देशात हवामान बदलाचा धोका वाढला असून या देशात पुरासारख्या आपत्ती उद्भवत आहेत. आशियाई देशात कोळसा हा उर्जेचा प्रमुख स्त्रोत असल्याने हा धोका आणखी वाढत असल्याचे ते म्हणाले. हवामान बदल हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून, या समस्येमुळे आज समुद्र काठावरच्या लाखो नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे, असे गुटेरस यांनी सांगितले.