पूर्व हवेलीत स्थानिक नेत्यांकडून चिंता : मतदानाचा टक्का घटणार?
लोणी काळभोर- शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीतील मतदानावर पावसामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवेलीच्या पूर्व भागात संततधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस उद्याही असाच बरसत राहिल्यास मतदानाची टक्केवारी घटण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. उद्या पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
विधानसभेची निवडणूक सर्व 288 मतदारसंघात एकाचदिवशी उद्या 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्रपक्ष यांची आघाडी व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मित्रपक्ष यांची महायुती, असा सामना होणार आहे.
शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, दिलीप वाल्हेकर, हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर आदींनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला आहे. या झंझावाती प्रचाराची सांगता काल संध्याकाळी झाली आहे. उद्या दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
यंदा हवेलीच्या पूर्व भागावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झाला आहे. जुन, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या पावसाळ्याच्या चारही महिन्यांत दमदार पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. गेल्या महिन्यातील जोरदार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते, काही ठिकाणी ओढ्या, नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचा गावांशी संपर्क तुटला होता.
आता शुक्रवार दि.18 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हवेलीच्या पूर्व भागात संततधार, रिमझिम पाऊस सुरू आहे. हा सुरु झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. हा पाऊस जर न थांबता सुरूच राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला पाऊस अजून दोन दिवस जोरदार पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेनेही वर्तवला आहे. या अंदाजामुळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनात काळजी वाटू लागली आहे. कारण जर संततधार, रिमझिम पाऊस असाच सुरु राहिला तर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे आपोआपच मतदानाची टक्केवारी घटणार आहे.
वेधशाळेने वर्तवलेला पावसाचा अंदाज खोटा ठरावा तसेच हा पाऊस उद्या दिवसभर थांबावा व आपल्या गावात, वार्डात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपला उमेदवार निवडून यावा म्हणून भरपूर कष्ट घेतले आहेत. हे कष्ट एकटा पाऊस धुवून टाकू शकतो. त्यामुळे पावसाने उद्या दिवसभर तर विश्रांती घ्यावी, अशी प्रार्थना दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते करीत आहेत.