शैलेश सोनवणे : न्हावी गावात आमदार थोपटेंची बैलगाडीतून मिरवणूक
भोर- राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेवरुन हद्दपार करुन परिवर्तन घडवले जाणार आहे. राज्यात महाआघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ भोर तालुक्यातील पूर्व भागातील बागायतदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्हावी 322 येथील गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत मतदारांशी संवाद साधताना सोनवणे बोलत होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे, राजगड साखर कारखान्याचे संचालक के.डी. सोनवणे, पोपटराव सुके, भोर तालुका पंचयत समितीचे सदस्य रोहन बाठे, कॉंग्रेसचे दिलीप बाठे, निगडे, रेखा टापरे, सीमा सोनवणे आदि मान्यवरांसह न्हावी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आमदार थोपटे यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढली. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी गुणंद, वाठार हिंगे, टाटरेवाडी, न्हावी 21, भोंगवली, भांबवडे, राजापूर, पांडे, सावारदरे, सारोळा, किकवी केंजळ, आदी गांवचा गांवाभेट प्रचार दौरा केला.
शैलेश सोनवणे म्हणाले की, भोर विधानसभामतदार संघातील ही निवडणूक युती सरकारचे परिवर्तन करणारी ठरणार असून प्रतिनिधी बदला परिवर्तन घडेल असा नारा देणाऱ्यांना भोरचे मतदार धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- आम्हाला वाटतंय तुमचं ठरलंय ।। मात्र ते मत पेटीतून दाखवून द्या. कॉंग्रेसचे सर्वाधिक कार्यकर्ते हे न्हावी पंचक्रोशीतील असून मला आडचण त्यांची नाही. फक्त, पाव्हण्यारावळ्यांना तेवढे तुम्ही संभाळा सर्वकाही नीट होईल. काही लोक इतिहास-भुगोल तपासत नाहीत नुसतंच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हे गाव आणि इथली लोकं कॉंग्रेसच्या विचारधारेला मानणारी आहेत. या भागात जी विकासाची कामे झालीत ती कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली आहेत.
– संग्राम थोपटे, आमदार