म्हणाले की चिदंबरम म्हणजे भुईला भार
सालेम – तामिळनाडुचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी आज ज्येष्ठ क्रॉंगेस नेते चिंदरबरम यांच्यावर सडकून टीका केली. चिदंबरम म्हणजे या भुईला भार असलेले व्यक्तिमत्व आहे अशा शब्दात त्यांनी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने काश्मीर बाबत जो निर्णय घेतला त्याला अद्रमुक पक्षाने पाठिंबा दिला होता. त्यावरून चिदंबरम यांनी अद्रमुकवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पलानीस्वामी यांनी हे प्रतिपादन केले.
काल चिदंबरम म्हणाले होते की उद्या जर केंद्र सरकारने तामिळनाडुलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला तरी अद्रमुक पक्ष त्या प्रस्तावाला विरोध करणार नाही. त्या अनुषंगाने बोलताना पलानीस्वामी यांनी चिदंबरम यांचा खरपुस समाचार घेतला. ते म्हणाले की चिदंबरम हे स्वार्थी नेते आहेत.
ते स्वत:च्या हितापलिकडे काहीही पहात नाहीत. इतकी वर्ष केंद्रात मंत्री राहुनही त्यांनी कधी तामिळनाडुचे हित पाहिले नाही. कावेरी लवादासारख्या महत्वाच्या विषयाकडेही त्यांनी कधी लक्ष दिले नाही. ते इतके वर्ष केंद्रात मंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी कोणती योजना तामिळनाडुत आणली, कोणता प्रकल्प त्यांनी येथे आणला असा प्रश्नही पलानीस्वामी यांनी उपस्थित केला.
त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा देशालाहीं काही उपयोग झाला नाही. ते केवळ या पृथ्वीला भार आहेत. केंद्रात अर्थमंत्री असताना त्यांनी तामिळनाडुला कधी पुरेशी आर्थिक मदत केली काय अशीही विचारणा त्यांनी केली. दरम्यान पलानीस्वामी यांच्या वक्तव्याचा खासदार कार्ती चिदंबरम यांनी जोरदार निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी असली हीन भाषा शोभत नाही असे त्यांनी म्हटले आहे.