माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले स्पष्ट
निमसाखर- शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो… येणारी विधानसभा निवडणूक मी लढणारच आहे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
निरवांगी येथे नंदिकेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर पाटील जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या धर्माला जागुन सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून 71 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले आहे. आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे, येणाऱ्या काळात मित्रपक्षानेही आघाडीच्या धर्माला जागावे अशीच अपेक्षा आहे. इंदापूरची जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. जनताच आता काय तो निर्णय घेईल. असा स्पष्ट इशाराही पाटील यांनी दिला.
यावेळी निरा-भिमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. यादव, विलासराव वाघमोडे यांच्यासह दगडवाडी, रासकरमळा, निरवांगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना गर्भित इशारा दिला आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता पाटील म्हणाले की, तालुक्याच्या सध्याच्या नेतृत्त्वाने पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलेली नाहीत. त्यामुळे आगामी काळात पाण्यासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. तालुक्याला आतापर्यंत मिळत असलेल्या पाण्यापैकी 10 टीएमसी पाणी, यापुढे मिळणार नाही; त्यामुळे शेती धेक्यात येणार आहे. पण, त्यामुळे तालुक्याचे सर्वच उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दगडवाडीचे महादेव कवितके यांनी प्रास्तावीक केले. निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ यांनी आभार मानले. निरवांगीचे माजी सरपंच दत्तात्रय पोळ यांच्यासह अन्य कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.