कांकेर (छत्तिसगड) – पंतप्रधान मोदींनी देशातील दहशतवाद संपवला आहे, आता नक्षलवाद शेवटचे श्वास मोजत आहे. माझे सर्व नक्षलींना आवाहन आहे की, एक तर त्यांनी शस्त्रे टाकून शरण यावे, अन्यथा त्यांचे नामोनिशाण आम्ही मिटवून टाकू.
शरणागती पत्करण्यासाठी अजून वेळ आहे, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील, अशा शब्दांत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना आव्हान दिले.
भाजप उमेदवाराच्या बाजूने प्रचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कांकेरला पोहोचले होते. शहा यांनी कांकेर येथील नरहरदेव मैदानावर सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा नक्षलवाद्यांना थेट इशारा देताना दिसले.
खरे तर १६ मार्च रोजी खैरागड, राजनांदगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात येईल, त्यानंतरच १६ एप्रिल रोजी छोटाबेठिया पोलीस ठाण्यांतर्गत हापाटोला जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी २९ नक्षलवाद्यांना गोळ्या घातल्या होत्या.
छत्तीसगड दोन वर्षांत नक्षलमुक्त होईल
अमित शहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवादावर नियंत्रण मिळवता आले नाही, मात्र सध्या भाजपच्या नव्या सरकारने नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी नवा आराखडा तयार केला आहे.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यांत ९० हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. केंद्रात मोदींचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर दोन वर्षांत छत्तीसगडमधील नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल.
छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही आत्मसमर्पण करा, अजूनही वेळ आहे. येत्या दोन वर्षांत छत्तीसगडची भूमी लाल दहशतीपासून मुक्त होईल.