दर वाढल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले
वडापुरी – एकीकडे दूध उत्पादकांना मिळणारा दर दिवसेंदिवस कमी होत असताना पशुखाद्य व चारा महाग होत असल्याने शेतकर्यांना पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने माळभागावरची पिके वाळून गेली. यावर्षी ओल्या चार्याबरोबरच शेतकर्यांना सुक्या चार्याचा प्रश्न भेडसावत आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा मार्चअखेर संपल्याने जनावरांना मिळणारे उसाचे वाढे बंद झाले. या पार्श्वभूमीवर कडब्याचा दर दोन ते अडीच हजारांवर गेला आहे. याबरोबर मकाही महागली आहे. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकंदरीत पशुधन सांभाळताना बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कडब्याचा दर 2500 ते 3200 रुपयांपर्यंत शेकडा पेंडी असा आहे. ज्या शेतकर्यांकडे पाचपेक्षा जास्त जनावरे आहेत ते पावसाळ्यापूर्वी वैरण मोठ्या प्रमाणात साठवून ठेवत असतात.
ज्वारी, मक्याची खरेदी
कडबा व मका या पिकांकडे जनावरांसाठी पोषक चारा म्हणून शेतकरी पाहत असतो. सध्या मागणी वाढल्यामुळे काही शेतकरी शेतामध्ये असणार्या उभ्या ज्वारी व मका पिकांची विक्री करीत आहेत. त्यामुळे बळीराजा दुभत्या जनावरांसाठी ज्वारी व मक्याची खरेदी करीत आहेत.