माले, (मालदीव) – मालदीवच्या संसदीय निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या चीन धार्जिण्या धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने या संसदीय निवडणुकांचे महत्व विशेष आहे. सागरी प्रभाव कायम टिकवण्यासाठी चीन आणि भारत या दोन्ही देशांकडून या निवडणुकांचे निकाल विशेष महत्वाचे आहेत.
अध्यक्ष म्हणून मुइझ्झू यांची निवड झाल्यापासून त्यांनी भारतविरोधी धोरण राबवायला सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या नेत-त्वाखालील आघाडीतून काही प्रभावशील मित्र पक्ष आघाडीतून बाहेर पडले आहेत. तर नवीन काही राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरले आहेत, त्यामुळे संसदेत मुइझ्झू यांच्या पक्षाला बहुमत मिळणे अवघड आहे.
संसदेतील ९३ जागांसाठी एकूम ६ राजकीय पक्षांनी ३६८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यंदाच्या निवडणुकीत ६ जागांची वाढ झाली आहे. मालदीवच्या निवडणुकीत एकूण २ लाख ८४ हजार पात्र मतदार आहेत. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून रात्री उशीरापर्यंत निवडणुकीचा निकालाचा अंदाज जाहीर होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षीय निवडणुकीत मुइझ्झू यांनी भारत विरोध हा एकमेव अजेंडा राबवला होता. भारतामुळे मालदीवच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी प्रचारादरम्यान केला होता. मालदीवमध्ये तैनात असलेल्या ७५ सुरक्षा रक्षकांना आणि दोन हेलिकॉप्टर, मालवाहू विमानाच्या सेवेसाठीचे कर्मचारी परत पाठवण्याचा निर्णय त्यांनी हट्टांने राबवला. मात्र त्यांच्या या धोरणाबद्दल मालदीवमध्ये मोठी नाराजी आहे.
मुइझ्झू यांच्या सरकारमधील ३ मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द उच्चारल्यामुळे भारतीय सोशल मीडियाने मालदीवमधील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. अनेक सेलिब्रिटींनी देखील मालदीवविरोधात भूमिका घेतल्यामुळे तेथील पर्यटन उद्योगाचे अलिकडच्या काळात नुकसान झाले आहे. मालदीवला जाणार् या भारतीय पर्यटकांची संख्याही घटली.
२०१३ मध्ये मालदीव चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला. या उपक्रमांतर्गत मालदीवमध्ये बंदर आणि महामार्गांचे जाळेचीनकडून उभारले जाणार आहे. आशिया, आप्रिका आणि युरोपातील प्रभाव वाढवण्यासाठी चीनकडून मालदीवचा उपयोग करून घेतला जातो आहे.