Bengaluru । कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ‘जय श्री राम’ घोषणेवरून काही लोकांमध्ये हाणामारी झाली, ज्यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावणे, दंगल भडकावणे आदी आरोपांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर अन्य दोघांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक अल्पवयीन आहे. बुधवारी (१७ एप्रिल) रामनवमीच्या दिवशी ही घटना घडली.
नेमकं काय म्हणाले पोलिस…
‘पवन कुमार, राहुल आणि बिनायक नावाचे तिघेजण कारने सेकंड हँड दुचाकी खरेदी करण्यासाठी जात होते. त्यांच्या हातात भगवा ध्वज होता आणि ते सर्वत्र ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. वाटेत दुचाकीवरून जात असलेल्या फरमान आणि समीर नावाच्या दोघांनी त्याला उत्तर बेंगळुरूमधील चिक्काबेट्टाहल्ली येथे थांबवले आणि तुम्ही घोषणा का देत आहात, अशी विचारणा केली. एफआयआरनुसार, फरमान-समीरने त्यांना फक्त ‘अल्लाह-हू-अकबर’ म्हणण्यास सांगितले.
घटना कशी घडली?
रिपोर्टनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “फरमानने तीन लोकांकडून ध्वज हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर दोन लोकांनी त्याचा पाठलाग केला. समीरने हे सर्व पाहिले आणि तेथून पळ काढला. काही वेळाने दोघेही कारमध्ये चढले. पण काही वेळाने समीर आणि फरमान परत आले आणि त्यांच्या हातात काठी होती.
पोलिसांनी सांगितले की, समीर आणि फरमान यांच्यासोबत आणखी दोन मुले होती, त्यापैकी एक अल्पवयीन होता, तर दुसऱ्याचे वय निश्चित केले जात आहे. चौघांनी मिळून कारस्वार पवनकुमार, राहुल आणि बिनायक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. समीर आणि फरमानने राहुल आणि बिनायकला खूप मारलं. राहुलवर काठीने हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली, तर बिनायकच्या नाकाला मार लागला.
बेंगळुरू पोलिसांनी चारही आरोपींना पकडले
मारहाणीनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पवन, राहुल आणि बिनायक यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी फरमान आणि समीरला अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचाल का ? बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी, छतावरून दगडफेक, अनेक जण जखमी