पिंपरी, (प्रतिनिधी) – पूर नियंत्रण रेषेत शेकडो ब्रास गौण खनिज टाकून इंद्रायणी नदीपात्र अरूंद करण्याचा सर्रास प्रकार दिवसाढवळ्या चर्होलीत होत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून या प्रकाराकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या नदी सुधार प्रकल्पाबाबत आता शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
काही महिन्यांपुर्वी इ्रांयणी नदीपात्रातील फेसाळलेल्या रसायनयुक्त पाण्याच्या प्रदूषणाने महापालिका चांगलीच मेटाकुटीला आली होती. प्रसार माध्यमांनी ही बाब उचलून धरल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे प्रदूषण रोखण्यासठी अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुढाकार घ्यावा लागला. आता पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य सरकार व पीएमआरडीएकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. नदीच्या सर्वेक्षणाकरिता महापालिका प्रशासनाने लाखो रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिका हद्दीतील चर्होली भागातील नागरिकरणाने मोठा वेग घेतल्याने याठिकाणी जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे फूटभर जमीनीसाठीदेखील याठिकाणी मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. त्यामुळे नदीपात्रालगतची मोकळी जमीन आता जागा मालकांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटू लागली आहे. याठिकाणी अनेक हॉटेल व्यवसायिकांनी व्यवसाय थाटला आहे.
तर नदीलगतची असलेलीमोकळी जागा आता भराव टाकून ती वापरायोग्य करण्यासाठी मोठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे इंद्रायणीचा श्वास घोटला जात आहे. पर्यावरणप्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त केली आहे.