नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शांतिगिरी महाराजांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले आहे. या अनुष्ठानानंतर त्यांची त्र्यंबकेश्वर शहरामध्ये जोरदार मिरवणूक काढण्यात आली. या माध्यमातून शांतिगिरी महाराजांनी एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले आहे. ‘खूप केले नेत्यांसाठी, आता लढू बाबांसाठी’ अशा आशयाचे फलक यावेळी शांतिगिरी महाराजांच्या भक्तांच्या हातामध्ये दिसून आले. त्यामुळे सध्या नाशिकमध्ये या फलकांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. आपल्याला उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. महायुतीतील अनेक नेत्यांची भेट घेत शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराने नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला होता.
मात्र, महायुतीच्या वतीने शांतिगिरी महाराजांना ठोस असे आश्वासन देण्यात आलेले नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची तयारी महायुतीमध्ये सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांनी आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
शांतिगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवारा नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. या आधी देखील शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. मात्र असे असले तरी तत्कालीन काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची साथ त्यांना मिळाली होती.
त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पाडण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान ठरले होते. आता पुन्हा एकदा शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडी तसेच महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.