सातारा, (प्रतिनिधी) – केवळ एक दिवस जयंती साजरी करून इतर दिवशी काहीच चांगले कार्य न करणे हे हितकारक नसते. डीजेच्या तालावर नाचून जयंती साजरी करणे हे केवळ तात्पुरता आनंद मिळविण्यासाठी आहे. याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छा कदापि पूर्ण होणार नाहीत.
बाबासाहेब हे विचारी व्यक्तिमत्व होते, अस्पृश्यांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपले सारे जीवन संघर्ष केला. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल. त्यासाठी बाबासाहेब यांचा विचार आचरणात आणून सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घ्यावा, असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुदाम भिवा दणाणे, बौद्ध विकास तरूण मंडळाचे बुद्धभूषण दणाणे,सुशांत दणाणे,राजेश दणाणे, सनी दणाणे, प्रा. विश्वजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, ३४ पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. पौंडाच्या मानाने भारतीयांच्या रुपयाचे मूल्य इंग्रजांनी कमी केले असा दोष त्यांनी इंग्रजांना लावला होता. प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाने भारतात नियोजन आयोग, रिझर्व्ह बँक, अर्थ आयोग, इत्यादी गोष्टी आल्या.
मजूर, भांडवलदार व शासन यांनी एकत्र येऊन मजुरांचे प्रश्न सोडवावेत. वेतन ठरवावे या गोष्टी त्यांनी केल्या. स्त्रियांना बाळंतपणाची रजा, आठवडी सुट्टी, कामगारांना संप करण्याचे अधिकार इतक्या अनेक न्याय गोष्टी त्यांनी केल्या.
मानवी हक्काची पायमल्ली करणारे कोणतेही धार्मिक तत्वज्ञान त्यांनी नाकारले आहे. कायदे करूनही माणसे नीट वागतील याची शास्वती नाही म्हणूनच चांगल्या भावनांची ,जोपासना करणारा धर्म त्यांनी स्वीकारला. आज जे बेताल वर्तन समाजात आढळते त्याला कारण अज्ञान आहे. खरा बुद्ध धर्म भारताच्या मनात रुजल्याशिवाय करुणा, मानवता जागी होणार नाही. चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेब यांचे विचारच उपयुक्त आहेत’ असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. विश्वजित जाधव यांनी आंबेडकरांच्या विषयी लिहिलेल्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमास मेघा दणाणे, सुमन दणाणे, पुष्पा ननावरे, सारिका ननावरे, कमल दणाणे, माता रमाई महिला मंडळ, बौद्ध धर्मीय बांधव, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.