सातारा, (प्रतिनिधी) – आपला देश, आपले राज्य ही महापुरुषांची खाण असून त्यांनी त्यांच्या समाजकार्यातून दिलेल्या विचारधनाची पेरणी प्रत्येकाने जर आपल्या अंत: करणामध्ये केली तर आणि तरच महामानवांंचा जयंती उत्सव ख-या अर्थाने साजरा केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी साताराचे अध्यक्ष भारत भोसले यांनी केले.
शाहूपुरी विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. भोसले बोलत होते. यावेळी शालाप्रमुख सौ. एस. एस क्षिरसागर, कार्यक्रमाचे समन्वयक एम. आर. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोसले पुढे म्हणाले, महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत बंद करून नवपिढीपुढे तसेच विचार बिंबविण्याचा जो प्रयत्न होताना दिसत आहे हे योग्य नाही. खरे तर महापुरुषांना कोणतीही जात- धर्म नसतो.ते तर समाजाच्या उत्थानासाठी जन्माला आलेले असतात. जे वाईट ते धिक्कारुन जे- जे चांगले ते- ते निर्माण करण्यासाठी त्यांचा संघर्ष असतो.
याचा फायदा सर्व समाजाला होत असतो.त्याचमुळे समाजासाठी ते दीपस्तंभ असतात. महामानवांनी दिलेले योगदान हे नवपिढीसाठी प्रेरणादायी असून आता वेगवेगळ्या झेंड्याची लढाई लढताना मानवता धर्माचीही गुढी उभारुन माणूस बनण्यासाठी कटिबद्ध राहूया.
प्रत्येक भारतीयाने आपापली जाती-धर्माच्या संस्कृती-परंपरांचे पालन उंबऱ्याच्या आत राहून जरुर करावे आणि ते योग्यच आहे. परंतु,उंबऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर मात्र मानवताधर्म हा आपल्यासाठी सर्वश्रेष्ठच असला पाहिजे. त्यातच राष्ट्रीय एकात्मतेचे बीज दडलेले असून माणसा- माणसातील भावनिक ओलावा जपत राष्ट्रीय एकात्मतेचा मूलमंत्र या निमित्ताने जपूया, असे आवाहन श्री. भोसले यांनी केले.
नवनाथ कांबळे म्हणाले , नवपिढीने या महामानवाचा वैचारिक वारसा समर्थपणे निरंतर चालवावा. यावेळी यश सुतार याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गायलेल्या गीताने सर्वांनाप्रभावित केले. अक्षरा मोहिकर,सार्थकी सपकाळ यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन एम.आर.जाधव यांनी केले. जगदीश सुपेकर यांनी आभार मानले.