नवी दिल्ली – भारत सरकारने इराण आणि इस्त्रायल या दोन देशांच्या संदर्भात ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या दोन देशांचा प्रवास करू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच जे भारतीय आता इराण आणि इस्त्रायल या देशांमध्ये आहेत त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून नोंदणी करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. बाहेर कमीत कमी जावे आणि अत्यंत काळजी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. (‘Do Not Travel To Iran, Israel Until Further Notice’: Govt Issues Advisory For Indians)
इराण अथवा इराणच्या पाठबळावर चालणाऱ्या संघटनांकडून इस्त्रायलवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी अमेरिका आणि तिच्या सहकारी राष्ट्रांना शंका आहे. ईद अथवा ईदच्या काही दिवस अगोदर हल्ला होऊ शकतो असा इशारा गुप्तचर संस्थांकडून प्राप्त झाला होता. मात्र आता पुढच्या काही दिवसांत हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सामान्यत: इराणचे पाठबळ असलेला हिज्बुल्लाह हा गट इस्त्रायलच्या उत्तर भागातून अर्थात लेबनॉनच्या बाजूने हल्ला करतो. यावेळी इस्त्रायलवर हल्ल्यासाठी दुसरी बाजू किंवा मार्ग शोधला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. थेट क्षेपणास्त्रे तसेच एकाच वेळी असंख्य ड्रोनचा माराही इस्त्रायलवर होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे.
एकूणच येत्या काही दिवसांत या भागातली स्थिती अत्यंत गंभीर वळण घेण्याची शक्यता असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीयांनी विनाकारण आपले प्राण संकटात टाकू नयेत या उद्देशाने ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
तणाव शिगेला
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. तो कमी करण्यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा आणखी एका नव्या युध्दाच्या भितीने ग्रासले आहे. विशेष म्हणजे तणाव कमी करण्यासाठी जरी अमेरिका प्रयत्नशील असली तरी त्या देशाचा सातत्याने होत असलेला हस्तक्षेपही इराणच्या नाराजीत वाढ होण्यास कारणीभूत ठरतो आहे.