नेवासा – संपूर्ण भारतात मोदींची लाट आहे, त्यामुळे विरोधकांकडून सध्या राज्यात सहानुभूती मिळविण्याचा खोटा प्रयत्न केला जात असून कोणी म्हणतो आमचा पक्ष पळविला, कोणी बोलतो बाप पळविला तर कोणी म्हणतो माझ्या मुलीला खासदार करायचे आहे, अशा शब्दांत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जोरदार समाचार घेतला. ठाकरे यांना सोडून आम्ही भाजपसोबत का गेलो, याची वस्तुस्थिती आम्ही दोन ते दिवसांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार असल्याचे स्पष्ट केले.
नेवासा येथील पावन गणपतीसमोर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात शनिवारी (दि.६) दुपारी दोन वाजता झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, भाजपाचे माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, श्रीरामपूरचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजपाचे सचिव नितीन दिनकर, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, बाळासाहेब पवार, जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, रासपाचे महेंद्र नजन, ऋषिकेश शेटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश डिके, संजय पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिमराज शेंडे, शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका प्रमुख मिरा गुंजाळ, शहरप्रमुख बाबा कांगुणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , विरोधक आता श्रीरामाच्याबद्दलही शंका उपस्थित करायला लागलेले असून त्यांना आता लोकशाही मार्गाने हद्दपार करण्याची गरज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर विकासाठी मोठ्या निधीची तरतूद केलेली असून शिर्डीचे भाविक संत ज्ञानेश्वर मंदिराकडे येण्यासाठी मास्टर प्लँन केला जाईल, असे सांगत विखे – पाटील म्हणाले की, खासदार लोखंडेंना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मात्र, निवडून आल्यावर तुम्ही विरोधकांना निधी देऊ नका, असे म्हणताच खासदार लोखंडे यांनी तुम्ही सांगाल ते करू, असे आश्वासन दिले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते या संकल्प महाविजय सभेस मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.