इंदापूर, (प्रतिनिधी) – प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सर्व समाजाने एकमेकांच्या सणउत्सवात आनंदाने सहभागी होऊन एकोप्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
इंदापूर शहरातील दर्गाह मस्जिद चौकात रमजानच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे मंगळवारी (दि. 2) आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा, सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन,
रितेश जगताप, सुनिल तळेकर, प्रमोद राऊत, अक्षय सूर्यवंशी, शुभम पवार, आरपीआय सरचिटणीस संदीपान कडवळे, अभिजित अवघडे, गटनेते कैलास कदम, रियाज बागवान, तोसिफ बागवान, शहीद बागवान यांच्यासह शहरातील सर्व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील आर्षाद सय्यद मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू मुस्लिम भाईचाराचा संदेश देण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून न चुकता इंदापूर शहरातील शहा परिवार, रमजान ईदच्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होवून सर्वांना शुभेच्छा देत असतात.
सर्व धर्मीयांना आपलेसे वाटणारे शहा कुटुंब
इंदापूर शहरात सर्वच धर्माचे नागरिक वास्तव्य करतात. सर्व नागरिकांना मदत करण्यासाठी शहा परिवार आघाडीवर असतो. त्यांच्याकडून नेहमीच सर्वधर्म समभावाचे दर्शन घडले आहे. त्यामध्ये सर्वांना स्थानिक, प्रशासकीय, वैयक्तिक किंवा सामूहिक मदत करण्यासाठी भरत शहा, मुकुंद शहा, अंकिता शहा व त्यांचे मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य असते.