– माधव विद्वांस
‘सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. कवी प्रा. डॉ. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांची आज जयंती (जन्म 2 एप्रिल 1926). कवी सूर्यकांत खांडेकर हे मितभाषी होते, म्हणजे वर्गात शिकविण्यापुरते बोलणारे असे शिक्षक होते. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजमध्ये (त्यावेळी कीर्ती कॉलेज) मराठीचे प्राध्यापक झाले.
त्याबरोबर महत्त्वाचे म्हणजे अर्थपूर्ण भावकविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध झाले. त्या काळातील वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. त्यांच्या कविता या प्रत्येकाच्या जणू मनाचा आरसाच होता. शाहीर पिराजीराव सरनाईक हे कवी सूर्यकांत खांडेकर यांचे मामा. त्यातूनच त्यांना मराठी पोवाडा वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याची प्रेरणा झाली.
मात्र, त्याचे प्रकाशन होण्यासाठी बराच कालावधी गेल्यावर तो शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आला. ‘सावली’ आणि ‘पानफूल’ ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे रसिकांच्या पसंतीस उतरलेले काव्यसंग्रह.त्यांच्या कविता बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट होत्या. सूर्यकांत खांडेकर यांनी सुमारे पाच मराठी चित्रपटांसाठी गाणीही लिहिली.त्यांची 7 गीते ध्वनिमुद्रित झाली आहेत. रोज दिसणारी निसर्गदृश्ये, घडणारे प्रसंग, त्यातला गोडावा मुलांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या बालगीतांमधून केला आहे.
‘त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का’ या गीतामुळे त्यांची कवी म्हणून सर्वदूर ओळख झाली. या गीतांतून खांडेकरांनी प्रत्येक माणसाला या विश्वातील जाणवणार्या पंचमहाभूतांचे न उलगडणारे प्रश्न परमेश्वरालाच विचारले आहेत व त्यातून वाचकांना व गीत ऐकणार्याला सर्वव्यापी परमेश्वराची ओळख होते. हे गीत 11 ऑगस्ट 1955 रोजी लिहिले.हे गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध व स्वरबद्ध केले.
‘सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी’ या कवितेतून विरह, आतुरता व तारुण्यसुलभ भावनांचा मिलाफ दिसून येतो. हे गीत श्रीनिवास खळे यांनी पहाडी रागात संगीतबद्ध केले व आशाताई भोसले यांनी त्याला स्वर दिला. तसेच ‘सख्या हरी जडली प्रीत तुझ्यावरी’ हे गीत वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केले व सुलोचना चव्हाण यांनी स्वर दिला.
‘उतरली सांज घरोघरी’ हे त्यांचे भावगीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले तर सुमन कल्याणपूर यांनी गायले. ‘गोकुळी बासरी’ हे शामसुंदर रागातील भावगीत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केले व निर्मला गोगटे यांनी स्वरबद्ध केले. तसेच ‘नांदते गोकुळ या सदनात’ हे गीतही दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केले व ते सरस्वतीबाई राणे यांनी स्वरबद्ध केले होते.
सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी अनुराधा खांडेकर यांनी लिहिलेले त्यांच्या आठवणीवर ‘सावली सूर्याची’ हे पुस्तक खांडेकरांच्या स्मृतिदिनादिवशी डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी या पुस्तकामुळे डॉ. खांडेकर यांचे अंतरंगही जाणून घेण्याची अनुभूती मिळेल, असा विश्वास डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. प्रा. डॉ. खांडेकर यांचे निधन 15 जून 1979 रोजी झाले.