पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, तसेच जनावरांसाठी चारा नाही. याबाबत आपण सातत्याने राज्य शासनाकडे लक्ष देण्याची मागणी करत असताना सरकार केवळ जागा वाटप आणि नाराजी दूर करण्याच्याच कामात व्यस्त आहे. त्यामुळे जनतेबाबत हे ट्रीपल इंजिन सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
तसेच शासनाने तत्काळ पाण्याचे नियोजन करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे. अशा स्थितीत निवडणुकीला सामोरे जात असताना या नागरिकांचा विचार होणेही आवश्यक आहे. आम्ही अनेकदा चारा छावण्या, पाण्याचे टँकर देण्याची मागणी सरकारकडे केली.
मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाणी खासगी टँकर सुरू झाले असून, खासगी छावण्याही सुरू झालेल्या आहेत. प्रत्यक्षात ही जबाबदारी सरकारची असून, सरकार त्याकडे दुलर्क्ष करत असल्याची टीकाही या वेळी सुळे यांनी केली.