लखनौ/ नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडीत असलेल्या कॉंग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत. त्यात अमेठी आणि रायबरेलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. येथून कॉंग्रेसने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना रिंगणात उतरवले आहे. (Lok Sabha Election 2024: Suspense of Congress continues in Rae Bareli)
दरम्यान, उत्तर प्रदेशात कॉंग्रेसने १३ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र चार उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. त्यात प्रामुख्याने रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपनेही अमेठीत स्मृती इराणींना उमेदवारी दिली असली तरी रायबरेलीतील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केले नाहीत. त्यांचे अन्य सगळे उमेदवार मात्र प्रचाराला लागले आहेत.
उत्तर प्रदेशात यावेळी भाजपविरोधात एकास एक लढत देण्याचा कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचा प्रयत्न होता. तथापि, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या प्रयत्नांना धूप न घालता आतापर्यंत आपले २५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्या सगळ्याच जागा लढवणार असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे येथे यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
रायबरेली येथून मध्यंतरी भाजपकडून नुपूर शर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची बातमी आली होती. तथापि, कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप निर्धारित झाला नसल्यामुळे किंवा त्याचे नाव समोर आले नसल्यामुळे भाजपनेही आपले पत्ते उघड केले नाहीत.
प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून रिंगणात उतरवण्याची कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. मात्र त्यावर पक्षाकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. अमेठीबाबतही तीच भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. कदाचित या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबातील सदस्य उभे राहतील किंवा दोन्ही उमेदवार बाहेरचेही असू शकतील त्यामुळे सस्पेन्स शिगेला पोहोचला आहे.