पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आपल्या विचारांचे नाही, तटस्थ आहेत, त्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्याबरोबर घ्या, असा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. एवढेच नव्हे तर स्वत: अजित पवार यांनी नाराज, तटस्थ आणि दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांना फोन करून मिळून काम करण्याची विनंतीही दादा स्टाइलने केली.
या वेळी वारजे, धायरी, बावधन भागांतील शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना फोन केल्यावर अनेकांची तारांबळ उडाली, तर काहींनी फोन नाॅट रिचेबल ठेवल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
बारामती लोकसभा निवडणूक पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यानुसार नियोजन, भेटीगाठी यासह प्रचारसभांसाठी पक्षातील मंत्र्यांचा फौजफाटा यामुळे समोरचा विरोधक आधीच मनातून हरलेला. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्लाच ठरला आहे. दरवर्षी या बालेकिल्ल्याला तडा देण्यासाठी विरोधक एकवटत असत. मात्र, बालेकिल्ला तसुभरही हलला नाही.
मात्र, या वेळी बालेकिल्याच्या बाहेरून नव्हे, तर आतूनच विरोधक तयार झाला आणि पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठेची असलेली निवडणूक निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नणंद- भावजय (सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार) एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार आहेत. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी बारामतीसह आता खडकवासला मतदारसंघात बैठकांचा जोर लावला आहे.
सलग दोन दिवसांपासून अजित पवार पुण्यात तळ ठोकून आहेत. या वेळी महायुतीतील पदाधिकाऱ्यांसह जे शरद पवार गटात आहे, त्यांनाही स्वत: फोन करून त्यांच्याशी चर्चा करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्य यांना बैठकीतून फोन लावून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे.
त्यांच्या अडचणी जाणून घेत बरोबर काम करण्याची विनंतीही केल्याचे दिसत आहे. या वेळी काहींनी हो ला हो, काहींनी दादा तसे काही नाही, विचार करू सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली, तर दोन ते तीन पदाधिकाऱ्यांनी फोन नाॅट रिचेबल ठेवले.
कामे मार्गी लावण्याचे आश्वासन
नाराजीचे कारण काय, सगळं बाजूला ठेवा आणि कामाला लागा. तुमची जी काही कामे असतील, ती मार्गी लागतील. तटस्थ राहण्यापेक्षा आपल्याकडे या, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. शिवाय महायुतीतील काही पदाधिकाऱ्यांच्या घरीही भेटी दिल्या. सगळ्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून आपल्याकडे घ्या, मला भेटायचे असेल त्यांना घेऊन या. कोणीही नाराज होता कामा नये, असा सूचनाही पवार यांनी शहर पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.