Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil| वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला दिला आहे. एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे 70 टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देतील, असे स्पष्ट मत व्यक्त केले. यापूर्वी देखील त्यांनी मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे, असल्याचे म्हंटले होते.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
“मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, हे मी त्यांना भेटून सांगितले आहे. परंतु ते निवडणूक लढण्यास तयार नाहीत. मी अजूनही सांगतो, माझा आणि माझ्या पक्षाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल. जालन्यातून त्यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर एकही रुपया खर्च न करता 70 टक्के मते घेऊन ते प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करतील. जरांगे यांनी लोकसभा लढावी, असा माझा आग्रह आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या आंदोलनाबाबत देखील भाष्य केले. “अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनाचा मी साक्षीदार आहे तसेच पवार आणि खेडेकरांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनही मी पाहिले आहे. छावा-जिजाऊ संघटनांची घौडदौड आणि दिशाही मी पाहिली आहे. या सगळ्या आंदोलनाचं पुढे काय होतं, हे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे जर त्यांना फसायचे नसेल तर त्यांना निवडणुकीला उभे राहावेच लागेल, असे मी स्वत: जरांगे यांना सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले.
सत्तेत असलेले निजामी मराठे रयत असलेल्या मराठ्यांना कधीही त्यांचे हक्क, अधिकार देणार नाही. त्यामुळे जर रयत असलेल्या मराठ्यांना हक्क आणि अधिकार मिळवायचे असतील तर जरांगे यांनी निवडणुकीला उभे राहावे, असा सल्ला आंबेडकर यांनी जरांगे यांना दिला.
राजकारण माझा मार्ग नाही – जरांगे
काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न पत्रकारांकडून करण्यात आला होता. त्यावर राजकारण माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे, हाच माझा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा: