नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने शुक्रवारी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्या आघाडीने आयोगाला सादर केलेल्या निवेदनात केला.
केंद्रीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात असल्याची सूचित करणारी काही उदाहरणे इंडियाच्या निवेदनात नमूद करण्यात आली. निवडणूक काळात विरोधकांना समान संधी मिळण्याचा अभाव आहे.
तशी संधी उपलब्ध करण्यासाठी निवडणूक काळात आयोगाने केंद्रीय यंत्रणांचे प्रमुख बदलावेत, अशी मागणी इंडियाने केली. निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या इंडियाच्या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांचाही समावेश होता.
आम्ही दिलेली तक्रार सामान्य स्वरूपाची नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे ते नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक करण्यात आली. ईडीने अटक केलेले ते पहिलेच विद्यमान मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याबाबीकडेही सिंघवी यांनी लक्ष वेधले.