पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सर्वसामान्यांच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगत अनेक जण भाजपसोबत सत्तेत गेले आहे. मात्र, त्यातील काही नेत्यांच्या कंपन्यांना राज्यातील मोठी कंत्राटे चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहेत. यातून शेकडो कोटींची दलाली या नेत्यांना मिळाली आहे, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील आश्रम शाळा, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या दूध पुरवठा, भोजनाची ही कंत्राटे असल्याचे दावा पवार यांनी केला. तसेच, अशी आणखी ९ प्रकरणे आपल्याकडे आहेत. लवकरच त्यांचा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोटही पवार यांनी केला. राज्यात सत्ताबदल होण्याच्या एक-दोन महिने आधीच ही प्रकरणे घडलेली असल्याने त्यामुळे भाजपसोबत गेल्यावर नेमका कोणाचा विकास झाला? असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.
राज्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये २०१९ पर्यंत विक्रेंदीत पद्धतीने निविदा काढल्या जात होत्या. त्यात सब काॅन्ट्रॅक्ट देण्याची तरतूद नव्हती. मात्र, २०२३-२४ मध्ये काढलेल्या निविदेत २,४०० रुपयांचे जेवणाचे दर दुपटीने वाढविण्यात आले. तसेच विक्रेंदीत पद्धत बंद करून एककेंद्री निविदा काढण्यात आली. सब काॅन्ट्रक्टचा नियम शिथिल करण्यात आला. राज्यातील चार मोठ्या नेत्यांच्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. ज्या सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचारी पुरवितात.
त्यांनी सब काॅन्ट्रक्ट नेमत तब्बल २५० कोटी रु. कमावल्याचे पवार म्हणाले. तसेच आश्रमशाळांमध्ये दूध पुरविण्याच्या निविदेतही बाजारात ५० रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचे दूध मिळत असताना तब्बल १४६ रूपये लिटरने हे दूध शासनाला देण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांकडून ते केवळ २७ रूपये दराने घेण्यात आले असून, यात पुणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यांतील डेअरीला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाल्याचा आरोप पवार यांनी केला.