संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये अयोध्येतील राममंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएचा उल्लेख केल्याबद्दल भारताने आज पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावले. जग प्रगती करत असताना पाकिस्तान मात्र अयोध्येतील राम मंदिर आणि सीएएचा मुद्दा उपस्थित करत आहे. हा तर एक विक्रम मोडल्याचे उदाहरण असल्याचे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी झालेल्या सत्रादरम्यान इस्लामोफोबिया विरोधातील उपाययोजना या विषयावरील ठरावाच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे कायम प्रतिनिधी राजदूत मुनीर अक्रम यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मुनीर अक्रम यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि सीएए कायद्याची अंमलबजावणी हे मुद्दे उपस्थित केले होते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये समंजसपणा, सखोल विचार आणि जागतिक परिपेक्षातून सर्व सदस्यांसाठी विचार केला जाणे अपेक्षित आहे. मात्र पाकिस्तानी प्रतिनिधींचा भारताबद्दलता दृष्टिकोन संकुचित आणि दिशाभूल करणारा असणे, हे दुर्दैवी आहे, असे कंबोज म्हणाल्या. आमसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने भारताची भूमिका विशद करण्यासाठी केलेल्या निवेदनामध्ये कंबोज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
इस्लामोफोबिया विरोधातील उपाययोजना या विषयावरील ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मंजूर झाला. ठरावाच्या बाजूने ११५ सदस्यांनी मतदान केले. ठरावाच्याविरोधात एकाही सदस्य देशाने मतदान केले नाही. तर भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, युक्रेन आणि ब्रिटनसह ४४ सदस्य तटस्थ राहिले.