मुंबई- भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आहेत असे बोलले जात आहे. शेअर बाजार नियंत्रकांनीही अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र ज्येष्ठ बँकर उदय कोटक ( Senior Banker Uday Kotak) यांनी यासंदर्भात सांगितले की, भारतीय शेअर बाजारात मोठा बुडबुडा निर्माण झालेला नाही.
राष्ट्रीय शेअर बाजाराने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी बोलताना कोटक यांनी सांगितले की, थोडाफार फेस आढळून येत आहे. असा प्रकार शेअर बाजारात कमी अधिक प्रमाणात निरंतर होत असतो. मात्र बाजार पूर्णपणे नियंत्रणात असल्यासारखी परिस्थिती आहे. यावेळी शेअर बाजाराचे बडे अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी शेअर बाजार नियंत्रक मधाबी पुरी बुच यांनी सांगितले होते की, स्मॉल कॅप आणि मिडकॅप मध्ये काही प्रमाणात फेस निर्माण झाला आहे.याकडे नियंत्रकाचे बारीक लक्ष आहे. या संदर्भात लवकरच एक तपशीलवार श्वेतपत्रिका जारी केली जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये अशी आमची इच्छा असल्याचे बुच यांनी त्यावेळी सांगितले होते.
यावर बोलताना कोटक यांनी सांगितले की जॉन केन्स या अर्थतज्ज्ञांनी शेअर बाजाराबाबत लोकांनी अंदाज बांधणे चूक नसल्याचे म्हटले होते. अंदाजाच्या आधारावरच गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात. जपानमध्ये 1980 ते 1989 या कालावधीत मोठा बुडबुडा निर्माण झाला होता. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांक पूर्वपदावर यायला 35 वर्षे लागली होती. तशा प्रकारची परिस्थिती सध्या भारतात नसल्याचे मत कोटक यांनी व्यक्त केले.
भारतात जपान सारखी परिस्थिती अजिबात नाही. भारतातील शेअर बाजारावर अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या नियंत्रण असते. भारतामध्ये गंभीर स्वरूपाची बुडबुड्याची परिस्थिती आता तरी निर्माण झालेली नाही. यावेळी त्यांच्या बाजूला मधाबी पुरी बुच बसल्या होत्या.
कोटक म्हणाले की शेअर बाजारात अपेक्षप्रमाणे फेसाळलेले वातावरण असते. त्यात वावग असे काही नाही. शेअर बाजाराबाबत जास्त संशय निर्माण झाल्यास भांडवल उभारणी अवघड होते. कर्जरोख्यावरील नफ्यावर कमी कर लागतो तर शेअर बाजारातील नफ्यावर जास्त कर लावतो हा परस्परविरोध दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
(There is no bubble in the stock market; Asserted by senior banker Uday Kotak)