नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यात जवळपास रोजच संघर्ष सुरू असतो. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणच्या कामांवरून या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यातच दिल्लीतील एक मंत्री आणि केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपालांच्या संबंधात एक विधान केले आहे.
दिल्लीच्या लोकांनी निवडलेल्या सरकारचे जे काही विषय आहेत त्यात नायब राज्यपालांची कोणतीही भूमिका असणार नाही असे स्वत: राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. असे जर असेल तर संगम विहार, किरारी आणि बुराडी या भागातील विषय मग कोणाच्या अखत्यारित येतात? ते लोकनियुक्त सरकारच्या अधिकारात येतात.
मग राज्यपाल तेथे का गेले असे सवाल सौरभ भारद्वाज यांनी विचारले आहेत. ते पुढे म्हणतात की नायब राज्यपाल तेथे गेले तर गेले, मात्र सोबत अधिकाऱ्यांनाही नेले. नायब राज्यपालांना चांगली कल्पना आहे की अधिकारी काम करत नाहीयेत. मात्र तरीही राज्यपाल त्या अधिकाऱ्यांचे फोटो ट्वीटरवर टाकत आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नायब राज्यपालांकडे आहेत. मग ते कारवाई का करत नाहीत?
नायब राज्यपालांनी संगम विहारचा दौरा केला होता. तेथील स्थितीवरून त्यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवले होते. त्याला केजरीवाल यांनीही तिरकस उत्तर दिले होते. विरोधी पक्षांनी जे काम करणे अपेक्षित आहे ते काम तुम्ही करत आहात असे केजरीवालांनी आपल्या उत्तरात म्हटले होते. तर राज्यपालांनीही सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे.
संगम विहारमधील लोकांच्या आमंत्रणावरून आपण तेथे गेलो होतो. ९ वर्षे सरकार असूनही या भागातील २० लाख नागरिकांना मूलभुत सुविधा मिळालेल्या नाहीत. येथे ना रस्ते आहेत ना गटारी आहेत. कचरा उचलण्याचीही कोणती व्यवस्था नाही. लोकांना नरकात राहावे लागत असल्यासारखी परिस्थिती आहे.