नवी दिल्ली – दिल्ली वक्फ बोर्डाच्या मनी लॉंडरिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दिल्लीच्या राउज ॲव्हेन्यू न्यायालयात त्यांच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दिल्ली वक्फ बोर्डावरील आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा खान यांच्यावर आरोप आहे.
त्यांनी जामीनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायाधीश राकेश सयाल यांनी ईडीची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज देताना जामीन नामंजुर केला आहे. खान यांना जर जामीन दिला गेला तर ते तपासात सहकार्य करणार नाहीत असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला होता.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे ईडीने आपल्या आरोपपत्रात खान यांचे नाव घेतले नव्हते. त्यांच्या तीन संशयित सहकाऱ्यांची नावे त्यांच्या आरोपपत्रात होती. एकूण पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आक्टोबर महिन्यात ईडीने आरोपींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर त्यांनी असा दावा केला होता की वक्फ बोर्डाच्या अवैध कर्मचारी भरतीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेण्यात आली होती व नंतर ही रक्कम स्थावर मालमत्तेत गुंतवण्यात आली.